केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’

160820154059

यवतमाळकरांची मार्शलला भावपूर्ण श्रद्धांजली
यवतमाळ दि. १८ – विलक्षण प्रतिभा असलेले केतन पिंपळापुरे यांची साहित्य निर्मिती जागतिक साहित्याच्या दालनात झेपावत होती. ‘हेमलॉक’ हा कवितासंग्रह त्यांच्या जगण्याची भीषणता चितारणारा होता. सत्याचे कडू घोट घेत त्यांनी ‘नोबल ट्रूथ’ वैश्विक उंचीचा सृजनात्मक अविष्कार घडविला. आंबेडकरी साहित्यात नवे सौंदर्यशास्त्र जन्मास घालणारा केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ होय, अशा शब्दात यवतमाळकरांनी मार्शलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्थानिक लॉर्ड बुद्धा टीव्ही कार्यालयात समता सैनिक दलाच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. सूरज ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून महाकवी वामनदादा कर्डक महाकाव्याचे चरित्रकार डॉ. सागर जाधव, चित्रकार बळी खैरे उपस्थित होते. आपल्या विलक्षण काव्यप्रतिभेने केतन पिंपळापुरे यांनी मराठी साहित्याचे अंतरंग ढवळून काढले. श्रद्धांजली सभेत केतन पिंपळापुरे यांच्या चौफेर लेखन व कार्यकर्तुत्वाच्या शैलीवर उपस्थितांनी प्रकाश टाकला. डॉ. सागर जाधव म्हणाले की, कार्यकर्ता, आंदोलक म्हणून केतनने सर्व आघाड्यांवर रणशिंग फुंकले होते. आंबेडकरी अस्मितेचा धगधगता ज्वालामुखी म्हणून समता सैनिक दलाची कमान आपल्या खांद्यावर घेतली होती. ‘सूर्यकंकण’ हाताशी बांधून व्यवस्थेच्या तटबंधीला घाम फोडत धावत निघालेली केतनची कविता प्रबुद्ध जगाचे नेतृत्व करणारी होती. एका योद्ध्याची कणखर भूमिका ती बजावत होती. चळवळीचा सेनापती म्हणून आपल्या घरादाराची पर्वा न करता त्यांनी आंबेडकरी आंदोलन गतिमान केले. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पक्ष या मातृसंस्थांना समर्पित होऊन कार्य करणे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपणे, हीच केतनला खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. सोबतच बळी खैरे, डॉ. सूरज ढाले, प्रा. प्रकाश दातार, कवी विनोद बुरबुरे, भास्कर चव्हाण, डॉ. अशोक कांबळे, मन्सूर एजाज जोश, प्रा. सिद्धार्थ भगत, योगानंद टेंभुर्णे आदींनी केतन पिंपळापुरे यांच्यातील कवी, आंदोलक, पत्रकार, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत आदी पैलूंवर विचार व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला. संचालन जगदिश भगत यांनी तर आभार विलास नरांजे यांनी मानले. सभेला समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक नरेश ताकसांडे, पद्माकर घायवान, विजय वासनिक, विजय तोडेकर, देवानंद भगत, सूरज पाटील, राहुल पाते, गौतम कांबळे, चंद्रबोधी घायवटे, शांतरक्षित गावंडे, प्रा. नीलेश भगत, विजयकुमार गाडगे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील यवतमाळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × = thirty two