
पुणे : गेल्या आठवड्यापासून श्रीलंकेच्या उंबरठय़ावर रेंगाळलेल्या मान्सूनच्या वाटचालीत प्रगती झाली असून, गुरुवारी मान्सूनने अरबी समुद्राच्या दक्षिण भागात प्रवेश केला.
नैऋत्य मौसमी वार्याची प्रगती गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेमध्येच रेंगाळली होती. निर्धारित वेळेच्या आधी दाखल होऊनही म्हणावी तशी प्रगती दिसत नसल्याने प्रत्यक्ष पाऊस हुलकावणी देत राहिला. लागोपाठ आठ दिवस श्रीलंकेत ठाण मांडून बसल्यानंतर गुरुवारी त्याच्या वाटचालीत प्रगती दिसून आली. श्रीलंकेचा अर्धा भाग, दक्षिण अरबी समुद्र, कॉमोरीन प्रदेश व बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग व्यापला आहे. यंदा मान्सून निर्धारित वेळेपूर्वीच केरळमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनच्या वाटचालीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न झाल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.
Archive for May, 2015
0
‘मान्सून’ अरबी समुद्रात दाखल
0
उपराजधानीत १0२ तीक्ष्ण शस्त्रे जप्त

नागपूर – मोमीनपुरा येथील एका जनरल स्टोर्सवर पोलिसांनी धाड टाकून बुधवारी मोठय़ा प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या उपराधानी नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.साहाय्यक पोलीस आयुक्त भगत यांनी माहिती दिली. मोहंमद नईम व जैजुल आबेदीन अंसारी (४९) रा. मोमीनपुरा असे अटक करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारावर तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर, साहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडसे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व तपास पथक कर्मचारी संजय आठवले, गंगाधर मुटकुरे, चंद्रशेखर वैद्य, अब्दुल करीम, देविदास, सुनील दिवटे, रवी, सचिन भिमटे, चालक विश्वास वाघ यांनी बुधवारी, २७ मे रोजी सायंकाळी मोमीनपुरा येथील आबिद जनरल स्टोर्सवर धाड टाकली. आरोपी अंसारी याचे आदिब जनरल स्टोर्स नामक दुकान आहे. त्याने ड्रॉव्हरमध्ये विक्रीकरिता विविध तीक्ष्ण शस्त्रे ठेवली होती. धाडीदरम्यान तहसील पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना मोठा शस्त्रसाठा आढळला. ही सर्व शस्त्रे मुंबई येथून आणली असून आरोपी मार्च महिन्यापासून शस्त्र विकण्याचा व्यवसाय करीत आहे. दरम्यान तलवार, ३१ खंजर, ८ कुकरी, ४३ चाकू, १४ सुरी, ५ गुप्ती असे एकूण १0२ अवैध शस्त्रे दुकानातून जप्त करण्यात आले. पोलिसांनी शस्त्रांसह ४ लाख ७0 हजार ९८0 रुपयेसुद्घा जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंसारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुंबईवरून आरोपी कोणत्या मार्गाने शस्त्रे आणायचा आणि कुणाला विकायचा तसेच जप्त शस्त्रे व रोख रक्कम त्याने कुठून आणली, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त भगत व पो. नि. मुजावर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सपोनि. बोंडसे, पाटील तसेच आठवले, मुटकुरे, वैद्य, अब्दुल करीम, देविदास, दिवटे, रवी, भिमटे, विश्वास वाघ आदी उपस्थित होते.
0
मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सावत्र बापाचा मृत्यू

कल्याण – मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र बापाचा पोलीस कोठडीत मूत्यू झाला आहे. प्रदीप भानुदास ताटे ( वय- ३२) असे मूत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.बलात्कारप्रकरणी ताटेला कोळसावाडी पोलिसांनी २४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर कल्याण न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ठार मारण्याची धमकी देऊन सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कल्याण पूर्वेत श्रीमलंग रोडला नांदिवली गाव परिसरात प्रदीप ताटे हा पत्नी मुलांसह राहत होता. प्रदीपच्या पत्नीला पहिल्या पतिपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रदीपची पत्नी अंधेरी येथील एका सुरक्षा संस्थेत गार्ड म्हणून नोकरी करते. त्यामुळे ती दोन-तीन दिवस नोकरी निमित्त बाहेर असते. काही दिवसांपूर्वी पत्नी कामावर गेल्याची संधी साधून प्रदीपने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन याची कुठे वाच्यत केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ही बाब पीडित मुलीने बापाच्या भीतीपोटी दडवून ठेवली होती. मात्र, अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला शारिरीक त्रास होऊ लागला. त्यानंतर धाडस करुन या मुलीने घडलेला धक्कादायक प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या नवऱ्या विरोधात तक्रार नोंदविली होती.
0
विधवेला लग्नाची परवानगी नाकारत जात पंचायतीने जिवंत जाळले

पाटणा, दि. २८ – एका ३५ वर्षीय विधवा महिलेचे तिच्या विधूर सास-यांशी संबंध असल्याची बातमी कळताच त्या महिलेला जात पंचायतीने जिवंत जाळले.
सुपौल जिल्ह्यातील पिपरा गावातील रहिवासी असणारी महिला व तिचे चुलत सासरे यांच्यातील संबंधांची माहिती विधवा महिलेच्या सासूला मिळताच तीने या प्रकरणाची माहिती पंचायतीला दिली. या प्रकरणी या विधवा महिला व तीचे चुलत विधूर सासरे घनशी यांना लग्न करायचे होते परंतु, जात पंचायतीला हा निर्णय मान्य नसल्याने एका कागदावर या महिलेशी झालेल्या घटनेबाबत गावातील कोणतीही व्यक्ती जबाबदार नाही या आशयाच्या मजकूरावर सही घेऊन तिला अंदाजे शंभर जणांसमोर जिवंत जाळले.
या प्रकरणी सुपौलच्या पोलीस अधीक्षकांना विचारले असता त्यांनी या घटनेची अद्याप माहिती नसल्याचे सांगितले आहे. तर, येथील ठाणे अंमलदार चंदन कुमार यांनी हत्येची तक्रार दाखल कुणीही केली नसल्याने आत्महत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे असे सांगितले. या विधवा महिलेला तीन मुलं असून घनशी या विधूर चुलत सास-यासही तीन मुले असून त्यांची पत्नी तीन वर्षापूर्वी वारली होती.
0
दलित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

अहमदनगर – नगरच्या कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दलित तरुणाचा आज सायंकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्याची नातवाईकांची तक्रार आहे. तर पळून जाताना तो जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पारनेर तालुक्यातील नितीन बाळू साठे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पोलिसांनी त्याला चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना शौचाला जातो असे सांगून तो विवस्त्र अवस्थेत पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता, असा पोलिसांचा दावा आहे. काही वेळातच पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच पुन्हा पकडले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असून पोलिस तो पळून जाताना जखमी झाल्याचा बनाव रचत आहेत, असा आरोप त्याचे नातेवाईक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
0
दोन मॉडेल्सचा पोलीस ठाण्यात गोंधळ

मुंबई- छेडछाड प्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत दोन मॉडेल्सनी पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. त्यांच्या या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांनी मुंबईतील मॉडेल श्रुती गुप्ता आणि पूजा मिश्रा या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारच्या मध्यरात्री ऑडी कारमधील काही तरुणांनी या मॉडलेची छेड काढली होती. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत या मॉडेलनी आत्ताच्या आत्ता त्या चार मुलांना अटक करुन तुरुंगात टाका, अशी मागणी करत पोलीस ठाण्यात गुरुवारी गोंधळ केला. त्यामुळे या मॉडेलविरोधात गैरवर्तणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री उशिरा पूजा आणि श्रृती घरी येत असतांना अंधेरी पश्चिम येथील लिंक रोड येथे एटीएमजवळ थांबल्या असता तेथे एका ऑडी कारमधून आलेल्या तरुणांनी अश्लील वक्तव्ये केली. दरम्यान पेट्रोलिंग करणारे पोलिस तेथे पोहचले. तेव्हा ते तरुण पळून गेले. परंतू या दोन मॉडेल्सनी पोलिसांवरच आरोप करत त्यांना जाणीवपूर्वक पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला. त्यामुळे त्या तरुणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले परंतू त्या दोघींनी त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि हे ते तरुण नाहीत, असे सांगून ख-या गुन्हेगारांना आत्ताच्या आत्ता अटक करा, अशी मागणी केली. तसेच पोलिसांविरोधात शिवीगाळ केली. यावेळी तेथे असलेल्या महिला पोलिसांनाही त्यांनी धक्काबुक्की केल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेचे चित्रिकरण सीसीटीव्ही कॅमे-यात असल्याने या दोघींना लवकरच अटक होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनजी नलावडे यांनी सांगितले.
0
गुंड आप्पा लोंढेची निर्घृण हत्या

पुणे – जिल्ह्यातील कुख्यात गुंड आप्पा उर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे (५५) याचा उरुळी कांचनजवळील सिंधवने रोडवर गोळ्या झाडून खून करण्यात आला. सकाळी मॉर्निक वॉकला जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर सत्तुराने वार करुन हत्या करण्यात आली. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पा उर्फ प्रकाश लोंढे आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर चालत जात असताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये आप्पा गंभीर जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना त्वरीत हडपसर येथील नोबल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ससून येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, ससूणच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे घटनास्थळावर बंदोबस्त ठेवण्यात आला. आप्पा उर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे यांची बारामती, हवेली, दौंडसह पुणे जिल्ह्यात दहशत होती. त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजीतसिंह परदेशी यांनी दिली. लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक अभीमान्यू पवार, सहायक पोलीस निरीक्षक रंजीतसिंह परदेशी, पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावर गावठी पिस्तुलाची एक पुंगळी सापडली आहे.
0
हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याशी संबंधित सर्व फाईल्स, कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२१ जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये सलमानच्या खटल्याशी संबंधित फाईल्स आणि कागदपत्रे आगीमध्ये जळाली. त्यामुळे सध्या राज्याच्या गृहखात्याकडे सलमानच्या खटल्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
मन्सूर दर्वेश यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. २००२ पासून सलमानच्या खटल्यावर आतापर्यंत किती खर्च झाला. राज्य सरकारने किती वकिल नियुक्त केले याची माहिती मन्सूर दर्वेश यांनी मागितली होती.
दर्वेश यांनी दोन सरकारी विभागांकडे अर्ज केले होते. त्यावर सरकारने २०१२ च्या मंत्रालयाच्या आगीत कागदपत्रे जळाल्याने आम्ही तुम्हाला उपलब्ध करुन देऊ शकत नाही असे उत्तर दिले. या खटल्यात सप्टेंबर २०१४ पासून विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक सुनावणीसाठी त्यांना सहाहजार रुपये शुल्क दिले जाते याची सरकारला माहिती आहे.
मंत्रालय आग प्रकरणानंतर राज्य सरकारने जळालेल्या सर्व फाईल्स, कागदपत्रे पुन्हा तयार करु असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांना ते शक्य झालेले नाही. सलमान खानचे प्रकरण त्याचे एक उदहारण आहे असे दर्वेश म्हणाले.
२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमानने बांद्रयामध्ये आपल्या आलिशान लॅण्ड क्रूझर गाडीखाली पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला चार जण जखमी झाले होते.
सहा मे रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना सलमानला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सलमानने लगेचच या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. विशेष म्हणजे सलमानला पाचवर्षांची शिक्षा होऊनही एकदिवसही तुरुंगात काढावा लागला नाही.
0
डाॅ.तानाजी चव्हाण यांना,राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार

कल्याण,ठाणे – वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिक पणाने समाजिक कार्य करत असलेल्या व्यक्तींना शासनाकडून किंवा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून,त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी गौरविण्यात येत असतो.व राष्ट्रीय मानवसेवा चिकत्सा रत्न पुरस्कारने गौरविण्यात आलेल्या डाॅ.तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन आमचे प्रतिनिधी सतिष राठोड यांनी संग्रहीत केलेली माहिती.
राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार हे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या डाॅक्टरांना देण्यात येतो.असा हा पुरस्कार सोहळा दि.२१ मे या दिवशी औरंगाबाद येथे पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.ना गिरीषजी महाजन ( जलसंपदा मंत्री ), मा. हरिभाऊ बागडे (महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष), मराठी चित्रपट नायिका मानसी नाईक उपस्थित होते.आणि डाॅ.तानाजी चव्हाण यांना मा. हरिभाऊ बागडे (महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष) यांच्या हस्ते राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
* डाॅ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण *
डाॅ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण एका छोट्याश्या खेडेगावातून झाले असुन प्राथमिक शिक्षणातही स्काॅलरशिप व नवोदय परिक्षा यशस्वी झालेले आहेत.
* डाॅ.चव्हाण यांचे वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय सेवेतील वाटचाल *
पुणे विद्यापीठ, औरंगाबाद, मुंबई, स्री व पुरुष नसबंदी शस्रक्रिया तज्न्य. तसेच पुणे विद्यापीठातून MBBS चांगल्यागुणाने उत्तीर्ण झाल्यानंतर,शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामाची सुरुवात.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नासिक येथिल बोलठाण व न्यायडोंगरी गांव येथे वैद्यकिय अधिकारी तसेच नांदगांव येथे तालुका आरोग्य अधिकारी (THO) पदावर २००९ पर्यंत कार्यरत.व २००९ पासुन जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुका येथे THO जून २०१४ पर्यंत कार्यरत. जून २०१४ नंतर आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत.
* डाॅ.चव्हाण यांना वैद्यकीय सेवेतील मिळालेले पुरस्कार *
सन २०११-१२ मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, व यापूर्वी शासन सेवेतील आदर्श आरोग्य अधिकारी ,आदर्श सर्जन पुरस्कार व आदर्श कारभार पुरस्कार ( Administrator Award ) असे अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले असुन शासन आरोग्य सेवेत उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणूनही गौरविण्यात आललेे आहेत.
मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री मा.ना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नागपूर प्रशिक्षण संस्था येथे Best Monitor Award ने सन्मानित झालेले आहेत.
प्राथमिक शिक्षण छोट्याश्या खेडेगावातून झाले असुन, परिस्थितीवर मात करुन आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे.त्यांच्या पत्नी सुध्दा डाॅक्टर असुन,सध्या विक्रीकर विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
* डाॅ.चव्हाण यांचे “जगरत्न प्रतिष्ठान” संस्था व कार्य *
डाॅ.चव्हाण यांचे “जगरत्न प्रतिष्ठान” ही संस्था सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.
“जगरत्न प्रतिष्ठान” यांचे जनसेवा आरोग्य संस्थेमार्फत गोर-गरीब ,गरजू, अनाथ व वृधांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य करीत आहे.तसेच डाॅ.तानाजी चव्हाण व सौ. डाॅ.सविता चव्हाण यांचे तरुणांसाठी वयात येतांना घ्यावयाची काळजी, आणि ” दशा व दिशा ” या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबीर राबवितात.
* भविष्यात या सुविधा मोफत देण्याचा मानस *
भविष्यात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त दवाखाना, हाॅस्टेल, वृधाश्रम व तरुणांना मोफत मार्गदर्शन व सर्व आरोग्याशी निगडित समस्यांवर मार्गदर्शन व सल्ला केंद्र उभारण्याचा मानस आहे.
डाॅ.तानाजी चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या ” महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ” व वाचक परिवारातर्फे हार्दीक शुभेच्छा………
0
माओवाद्यांचा पत्नीसह काँग्रेस नेत्यावर गोळीबार
गडचिरोली – छत्तीसगडच्या जगदलपुर जिल्ह्यातील कोंटा येथील काँग्रेस नेते पोडीयम सुक्का आणि त्यांच्या पत्नीवर माओवाद्यांनी गोळीबार केला. तर जिल्ह्यातील परसपाल येथेही माओवाद्यांनी दोन नागरिकांची मध्यरात्री हत्या केली. ‘जीरमघाटी हल्ल्या’च्या पार्श्वभुमीवर हा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेस नेते पोडीयम सुक्का आणि त्यांच्या पत्नीला जखमी अवस्थेत तेलंगणाच्या भद्राचलम रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. सलवा जुडूममध्ये पोडीयम सुक्का यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड ‘जीरमघाटी’ घटनेला आज दोन वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेत ३० पेक्षा अधिक काँग्रेस नेत्यांना माओवाद्यांनी ठार केले होते. सलवा जुडूमचे प्रणेते महेंद्र कर्मा विद्याचरण शुक्ल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मृत्यू झाला होता. परसपाल येथील हल्ल्यात मृत नागरिकांची सलवा जुडूममध्ये भुमिका असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला होता. यावरून त्यांची हत्या केली जात असल्याचे समजते.
0
विद्यार्थ्यांच्या अंगावर फेकले उकळते तेल

नाशिक – मनमाड रेल्वे स्थानकावर यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये चालत्या गाडीत पॅनट्री (स्वयंपाक गृहातील) कर्मचाऱ्यांनी तापते तेल विद्यार्थ्यांच्या अंगावर फिरकावल्याचा प्रकार घडला. यात पाच जण जखमी झाले असून पोलिसांनी रेल्वे स्वयंपाक गृहातील १८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर जखमींना मनमाड उप जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी बंगळूरहून दिल्लीकडे यशवंतपूर एक्सप्रेसने ६२ विद्यार्थी प्रवास करीत होते. यावेळी त्यांनी रेल्वे पॅनट्री कर्मचाऱ्यांकडून बिर्याणी घेतली. दरम्यान बिर्याणीमध्ये लोखंडी स्क्रू निघाल्याने त्याबाबत विचारणा करण्यास हे विद्यार्थी मॅनेजरकडे गेले असता, तेथील कर्मचाऱ्याने तापते तेल विद्यार्थ्यांच्या अंगावर फिरकावले. यादरम्यान बोगीत हाणामारी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर हाणामारीत गरम पाणी खाली सांडल्याने ५ जण जखमी झाल्याचे पॅनट्री बोगी मॅनेजर यांनी सांगितले आहे. रेल्वे पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले असून ३ विद्यार्थी आणि २ पॅनट्री कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या सगळ्या गोंधळात यशवंतपूर एक्सप्रेस मनमाड स्थानकात एक तास खोळंबून होती.
0
३ अपघातात २० ठार, २४ जखमी

पालघर/पुणे/नांदेड – आठवड्याचा पहिलाच दिवस राज्यात झालेल्या तीन भीषण अपघातांनी घातवार ठरत आहे. तीन अपघातात २० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. पहिल्या दुर्घटनेत बारामती तालुक्यातील तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या स्कॉर्पिओला आंध्रप्रदेशातील कर्नूल येथे अपघात होऊन यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री अडीचच्या सुमारास झाला. दुसऱ्या एका घटनेत आज सकाळी पावणेचारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन बसमध्ये टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवासी ठार झाले तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे.जखमींना मुंबई आणि गुजरातमधील वेगवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यात स्विप्ट कारला भरधाव डंपरने धडक दिल्याने बीड जिल्ह्यातील परळी येथील एकाच कुटुंबातील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बारामती तालुक्यातील तिरुपती भक्तांचा आंध्रप्रदेशातील कर्नूल येथे झालेल्या अपघातात ७ युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, अनिल रमेश गवळी, शेखर बापूराव गवळी, ऋषिकेश पोपट गवळी, मोहन दत्तात्रय गवळी आदी सामिल आहेत. हे सर्वजण बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ आणि उंडवडी सुपे येथील रहिवासी आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये गुजरातमधील नडीयाद येथून एक खासगी आरामबस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असताना तलासरीजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या एका मिनी बसने या आराम बसला जोराची धडक दिली. डिव्हायडर तोडून ही बस आरामबसवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसमधील ११ प्रवासी जागीच ठार झाले. तर २० जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
भरधाव डंपरने धडकेत कारमधील दोघेजण ठार, तर चार जण गंभीर
नांदेड – भरधाव वेगात असणाऱ्या टिप्परने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी येथील एकाच कुटुंबातील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री लोह्याजवळील सुनेगाव टाळावा येथे हा भीषण अपघात झाला.
या अपघातात कारमधील राजेंद्र कानगावकर (वय ४७), वच्छला कानगावकर हे दोघेजण जागीच ठार झाले. तर वैशाली कानगावकर, साधना कानगावकर, समर्थ कानगावकर व कारचालक गंभीर जखमी झाले आहेत.
उमरी येथे साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून कानगावकर कुटुंबीय स्विफ्ट डिझायर कारने (एम एच ४४ जी १६८४) परळीकडे परतत होते. लोह्याच्या शिवाजी चौकातून गंगाखेड मार्गाकडे वळाल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनेगाव तलावालगत समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील टिप्परने (एम एच २६ ३४१) कारला समोरून धडक दिली. घटनेनंतर टिपरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
0
दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे निधन

बीड – देशातील दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात अल्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
‘मानवी हक्क अभियाना’च्या माध्यमातून दलित व वंचितांसाठी संघर्ष करणारे बंडखोर दलित नेते अॅड. एकनाथ आव्हाड यांच्या निधनामुळे दलीत चळवळीचा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. पोटाच्या अल्सरने त्रस्त असलेले आवाड हैदराबाद येथील एशियन रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आवाड यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आव्हाड यांच्या निधनामुळे परिवर्तनाच्या लढाईतला बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आव्हाड यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मातंग कुटुंबात झाला होता. अत्यंत खडतर परिस्थितीत शिष्यवृत्तीच्या बळावर, लोकांच्या मदतीने आव्हाडांनी बी.ए. आणि नंतर एम.एस.डब्ल्यू.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते विवेक पंडित यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करू लागले. वेठबिगारांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठवले होते.
‘मानवी हक्क अभियान’ या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. आव्हाड यांच्या या अभियानामुळे मराठवाड्यातील दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीचे प्रतीक असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळीचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच ‘जग बदल घालुनि घाव’ हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.
0
पत्नी व मुलाने केला इसमाचा खून

यवतमाळ, दि. २४ (रवी चरडे) – कौटुंबिक वादातून पत्नी व मुलानेच दगडाने ठेचून इसमाचा खून केला. शनिवारी रात्री ८ वाजता दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे ही घटना घडली. याप्रकरणी लाडखेड पोलिसांनी आरोपी पत्नी व मुलास अटक केली आहे.
प्रकाश बाबराव फरकाडे (४८) रा. पाभळ असे मृतकाचे नाव आहे. तर यमुना प्रकाश फरकडे (४०), गजानन प्रकाश फरकडे (१८) अशी आरोपींची नावे आहे. मृतक व आरोपींमध्ये सतत वाद होत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीही त्याच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने पत्नी यमुना व मुलगा गजानन याने दगडाने ठेचून प्रकाशला जागीच ठार केले. याप्रकरणी मृतकाची आई धु्रपदा बाबाराव फरकाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून तपास ठाणेदार क्षिरसागर करीत आहे.
0
गॅस टँकरला अपघात
ठाणे – सुरतहून तळोजाच्या दिशेने जाणा-या अमोनिया गॅसच्या टँकरला रविवारी सकाळी अपघात झाला. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वायूगळती झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
मुंब्रा बायपासजवळ तब्बल १४५० टन अमोनिया गॅसने भरलेला एक टँकर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोसळला. टँकरचा व्हॉल्व निघाल्याने वायूगळती सुरु झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून सैनिकनगर, कौसा भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.अपघाताचे वृत्त कळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. या अपघातामुळे या मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे.
0
समलैंगिक विवाहाला संमती

डब्लिन – आर्यंलड देशामध्ये समलैगिंक विवाहाला शनिवारी मंजुरी देण्यात आली. याप्रकारच्या विवाहाला संमती देणारा आर्यंलड हा पहिलाच देश ठरला आहे. हा निर्णय आर्यंलडमधील शक्तिशाली कॅथलिक चर्चसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे.
समलैंगिक विवाहांना परवानगी द्यावी की नाही याबाबत जनमत मागवण्यात आले होते. त्यात ४३ क्षेत्रांपैकी ४० क्षेत्रांतील ६२.३ टक्के नागरिकांनी या विवाहाला संमती दर्शवली.
या निर्णयानंतर डब्लिन कॅस्टलच्या मैदानावर समलैंगिक विवाह समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी सप्तरंगी झेंडेही फडकावण्यात आले. समलैंगिक विवाहाबाबत आयर्लंडमधील सुमारे ३२ लाख नागरिकांनी मतदान केले.आयर्लंडमध्ये १९९३ पर्यंत समलैंगिक संबंधांना अवैध मानले जात होते. तर १९९६ पर्यंत घटस्फोटांना आर्यंलडमध्ये बंदी होती.
0
आ. कृष्णा घोडा यांचे निधन

पालघर -पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा (६४) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री मनोरजवळ एका लग्नसोहळ्यासाठी गेलेले आमदार घोडा घरी परत येत असताना त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. नातलगांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
0
पोलीस ठाण्याच्या मालखान्यातून ४१ लाख चोरी

यवतमाळ, दि. १४ – साडेतीन महिन्यापूर्वी हवाल्यासाठी आलेली ४१ लाख रुपये रक्कम वडगाव रोड पोलिसांनी जप्त केली होती. मालखान्यात असलेली सदर रक्कम ठाण्यातीलच पोलीस शिपायाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. या प्रकाराने ठाणेदारासह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या पायाखालची वाळू सरकली असून पोलीस वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
निर्मल उत्तम राठोड (३६) रा. पोलीस निवासस्थान पळसवाडी कॅम्प असे पोलिस शिपायाचे नाव असून तो वडगाव रोड ठाण्यात कार्यरत आहे. हेड मोहरर अशोक पत्रकार यांचा तो मदतनीस म्हणून काम करीत होता. जिग्नेश रसिकभाई पटेल (२१) रा. ग्रीनपार्क सोसायटी मैसान (गुजरात) ह.मु. रायली प्लॉट अमरावती याला २९ जानेवारी २०१५ रोजी रात्री येथील बसस्थानकावर अटक केली होती. संशयास्परित्या फिरणाºया सदर आरोपीजवळील बॅगची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये तब्बल ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची बेहिशेबी आढळून आलेली रोकड जप्त वडगाव रोड पोलिसांनी जप्त केली होती. तेव्हापासून सिल केलेली रक्कम वडगाव रोड पोलिस ठाण्यातील मालखान्यात ठेऊन होती. या मालखान्यातील साहित्य नवीन इमारतीमध्ये ठेवायचे असल्याने ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांनी बुधवारी सायंकाळी तेथील पाहणी केली असता सदर रक्कम दिसली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी सायंकाळी हेड मोहरर पत्रकार यांना सदर रक्कम शोधण्याचे सांगितले. त्यावरून मालखान्यातील साहित्याची शहानिशा केली असता सदर रक्कम ठेऊन असलेल्या पेटीचे कुलुप तुटल्याचे दिसले. त्यामुळे ही रक्कम चोरी गेल्याचे उघड झाले. या प्रकाराने ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांच्या पायाखालील वाळू सरकली. तसेच मदतनीस निर्मल हा चार दिवसापासून रजा न घेता गैरहजर असल्याचे उघड झाले. हा गंभीर प्रकार असल्याने ठाणेदार व डी.बी. पथकाने या शिपायाची शोधमोहीम सुरू केली. रात्री १ वाजताच्या सुमारास निर्मलला वडील सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक उत्तम राठोड यांच्या आनंदवाडी नेर येथील घरून ताब्यात घेतले. रात्रभर त्याची बंदद्वार चौकशी केल्यानंतरही तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. जर पैसे नेले असतील तर परत दे आपण प्रकरण मॅनेज करू असेही त्याला सांगण्यात आले. तरीही त्याने पैसे चोरल्याची कबुली दिली नाही. शेवटी आज गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन संपुर्ण कसब पणाला लावून सदर शिपायाला पैलावर घेतले. त्यानंतर त्याने आपणच पैसे चोरल्याची कबुली दिली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक जानकीराम डाखोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निर्मल राठोड याच्याविरूद्घ गुन्हा दाखल केला. या शिपायाने यापूर्वीही पोलीस ठाण्यातील मालखान्यातून तीन ते चार वेळा कोणालाही सुचना न देता २०-२० हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार उघड होताच त्याने सदर रक्कम भरून दिली होती. तेव्हाच या शिपायावर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. पोलीस शिपायी निर्मल राठोड याने दारव्हा तालुक्यातील जवळा ब्रम्हणाथ येथे राहणारे सासरे शेषराव चव्हाण यांच्या घरी चोरी केलेली रक्कम नेऊन ठेवल्याची कबुली पोलिसां समक्ष दिली. घरामध्ये एका खोलीत मोठ्ठा गड्डा करून त्यामध्ये पैसे पुरले. त्यावर ज्वारीने भरून असलेले पोते ठेऊन गड्डा बुजविल्याचेही त्याने सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जवळा ब्रम्हणाथ येथे जाऊन गड्डा खोदून रक्कम बाहेर काढली. यावेळी पोलिसांनी ३९ लाख १० हजार ६०० रुपये जप्त केली असून उर्वरीत ३ लाख ५६ हजार रुपये गायब आहे.
0
यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस
यवतमाळ – जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह आज पाच वाजतादरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. काही काही ठिकाणी गारपीट झाल्याने दाणादाण उडाली. पुसद, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, दिग्रस तालुक्यात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे.
पांढरकवडा तालुक्याला एक तासपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाºयासह गारपीट झाल्याने आंबा, निंबू, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. महागाव तालुक्यात ५.३० वाजतादरम्यान अवकाळी पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाट, वादळी वारा सुरू असताना गारपीटीला सुरूवात झाली. अवकाळीच्या तडाख्यात आमणी, अंबोडा, गीरगाव, बिजोरा आदी गावातील जनतेची तारांबळ उडाली. रस्त्यावरील वृक्ष उन्मळून पडली. तसेच वीज तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. दिग्रस तालुक्यात डेहणी, माळहिवरा, कलगाव येथे नुकसान झाल्याची माहिती आहे.
0
अधिक्षक अभियंत्यासह दोन निलंबित

यवतमाळ दि. ४ – वीज वितरणच्या हेकेखोरपणामुळे बळी गेलेल्या शेतकºयाला मृत्यू नंतर न्याय देण्याचा उफराटा कारभार वितरणच्या वरीष्ठांनी केला. सोमवारी संतप्त गावकरी शेतकºयाचा मृतदेह घेऊन अधीक्षक अभियंत्याच्या निवासस्थानी जाण्याच्या पवित्र्यात होते. दरम्यान पालकमंत्री ना. संजय राठोड यांचेसह वरीष्ठ अधिकाºयांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने गावकरी शांत झाले. या आधिच उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनीही मनिहार यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान आज सांयकाळी वीज वितरणच्या अकोला येथील वरीष्ठांनी यवतमाळ मंडळाचे अधिक्षक अभियंता अशोक फुलकरयांचेसह बाभूळगावचे उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे, शहर वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता संजय कांबळे यांचे तडकाफडकी निलंबन केले.












