
चेन्नई – २०१४ हे वर्षे भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत चमकदार वर्ष ठरले. भारताची पहिलीच मंगळयान मोहीम यंदा यशस्वी झाली. पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. त्यामुळे जगभरातून भारताचे कौतुक झाले. केवळ या मोहिमेवरच न थांबता भारताने रॉकेट, उपग्रह अंतराळात सोडण्याबरोबरच तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत मोठी बाजी मारली.
भारत हा यापूर्वी अंतराळ मोहिमांसाठी अमेरिका, रशिया, फ्रान्सवर अवलंबून होता. त्यामुळे भारताने या मोहिमांसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रारंभ केला. या संशोधनाला २०१४ मध्ये मोठे यश मिळाले. आंतरध्रुवीय मोहीम, क्रायोजनिक इंजिनची चाचणी, अवजड रॉकेटची चाचणी आदी तांत्रिक आघाड्यांवर इस्रेने कमाल केली. भविष्यात भारतातर्फे मानवी मोहीम राबवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली.
भारताने भावी अंतराळ मोहिमांसाठी मानवी कुपी तयार केली आहे. या कुपीमध्ये दोन ते तीन अंतराळवीरांची राहण्याची सोय आहे. या कुपीच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच क्रायोजेनिक इंजिनविरहित रॉकेटची चाचणीही झाली.









