
नागपूर- तब्बल दहा वर्षानंतर कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्याच्या निकाल सोमवारी जाहीर झाला. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी सर्व १८ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.
विशेष म्हणजे या खटल्यात १८ पैकी सात महिला आरोपी होत्या. न्यायालयातच एका गुंडाची हत्या केल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे होते. ज्या जमावाने यादवची हत्या केली होती. त्यात महिलांची संख्या मोठी होती. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली आदी गुन्हेगारी कृत्याने कस्तुरबानगर परिसराला वेठीस धरणा-या अक्कू यादव याला १३ ऑगस्ट २००४ रोजी जिल्हा न्यायालयात संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून ठार मारले होते. त्यानंतर जमावाने त्याचे घर देखील जाळून टाकले होते. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली होती. त्यापैकी तिघांचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला.









