
जिल्हा शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार, नातेवाईक संतप्त
यवतमाळ – येथील वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती करण्यात आलेल्या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टरांना महिला जिवंत आहे की मृत्यू पावली, याचा अंदाज लावता आला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तिने श्वास सोडला म्हणून ‘डेथ सर्टीफीकेट’ बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र महिलेचे पल्स पुन्हा सुरू झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.
आरोग्य विभागाकडून दरवर्षी जिल्हावासींयाच्या सदृढ आरोग्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्ची घातल्या जात आहे. मात्र आजही उपजिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार मिळत नाही. प्रसुतीसाठी सुविधा असतानाही रुग्णांना यवतमाळ रेफर केल्या जात असून, खासगी रुग्णालयात सिझर साठी ३० ते ४० हजार रूपये खर्च येते. त्यामुळे रुग्ण कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मोठ्या अपेक्षेने येत आहे. नेर येथील निखत परवीन महम्मद शफीक या महिलेला प्रसुतीसाठी २३ नोव्हेंबरला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. काल सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तिची प्रसुती झाल्यानंतर जन्म झालेल्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती गंभिर झाल्याने तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली. प्रकृतीत कुठलिही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला व्हेटेंलेटरवर ठेवले. दरम्यान काल सोमवार ते आज मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत चारदा तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. त्यापैकी तीनदा त्या महिलेचे ठोके सुरू झाले. आज सकाळी ठोके बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिचा श्वास सुरू झाला नाही. डॉक्टरांनी मात्र महिलेचा मृत्यू झाला अशी अधिकृत घोषणा करण्याऐवजी महिलेच्या नातेवाईकांकडून कोºया अर्जावर सह्या घेऊन हळूहळू आपली प्रोसेस सुरू केली. नातेवाईकही डॉक्टर काहीच सांगत नसल्यामुळे संभ्रमात होते. डॉक्टरांच्या चुप्पीमुळे नातेवाईकांना आपला रुग्ण मृत पावल्याची शंका आली. त्यांनी तिला घरी घेवून जाण्याची तयारी सुरू केली. दरम्यान महिलेला व्हेटेंलेटरवरून काढण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांना पल्स सुरू दिसले. क्षणभर तेही अचंबित झाले. त्यांनी लगेच तिच्यावर उपचार सुरू केला आणि डेथ सटीफिकेट बनविण्याची प्रक्रीया थांबविण्यात आली.
महिलेचा मृत्यू झाला म्हणून तब्बल दीड तास रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप नातेवाईक करीत असून,सध्या महिलेवर उपचार सुरू आहे. या प्रकरणाबद्दल माहिती सांगण्यास अधिकाºयांनी टाळाटाळ केली. महिला जिवंत असल्याचे लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेमुळे कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचा कारभार किती बेजबाबदारपणे सुरू आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.









