अफझलची फाशी चूकच: थरूर

shashitharoor1

नवी दिल्ली – ‘संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला फाशी देणे चुकीचे होते, हे प्रकरण तेव्हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले’, असे धक्कादायक विधान करत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निर्णयाला लक्ष्य केले आहे.
दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीला आजच दोन वर्षे पूर्ण होत असताना थरूर यांनी आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला घरचा आहेर दिला आहे. गुरूला फाशी देण्याचा निर्णय यूपीए सरकारने घेतला तेव्हा गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. गुरूच्या फाशीवरून तेव्हा काश्मिरमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता दोन वर्षांनंतर या फाशीप्रकरणावरील खपले पुन्हा एकदा काढण्यात आली आहेत.
काश्मीरमधील पाच काँग्रेस आमदारांनी अफझल गुरूला दिलेली फाशी ही चूक होती, असे निवेदन जारी केल्यानंतर पाठोपाठच शशी थरूर यांनी या निवदेनाची री ओढून नव्या वादाला फोडणी दिली आहे. ‘माझ्या मते दोन वर्षांपूर्वी अफझलच्या बाबतीत जे घडले ते चुकीचे होते आणि चुकीच्या पद्धतीने त्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. फाशी देण्याआधी त्याच्या कुटुंबाला कल्पना द्यायला हवी होती, शेवटची भेट घेण्याची संधी मिळायला हवी होती आणि त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन व्हायला हवे होते, पण यापैकी काहीच झाले नाही’, असे ट्विट थरूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − two =