
बीड – बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मोहा परिसरात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध पध्दतीने अफूचे पीक घेतले होते. याप्रकरणी अंबाजोगाई येथील न्यायालयाने पंचवीस आरोपींना दहा वर्ष कैद आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
बीड जिल्ह्यात २०१२ मध्ये पोलिसांनी छापा टाकून शेकडो एकरवर घेतल्या जाणाऱ्या अवैध अफू शेतीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी परळी तालुक्यातील मोहा परिसरातील कान्हापूर, वंजारवाडी, घोरपडदरा तांडा येथील ३८ आरोपी शेतकरी व नांदेड येथील चार व्यापार्यांविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक तीन मध्ये या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायाधीश नवनाथ कोल्हे यांनी त्यापैकी २५ आरोपी शेतकर्यांना दहा वर्ष कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने के. व्ही. गिरवलकर यांनी तर आरोपींच्या बाजूने अण्णासाहेब लोमटे, डी. व्ही. गाढे, डी. डी. लांब आणि हनुमंत राऊत यांनी काम पहिले.









