
अमेठी- अमेठी मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे राहिलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीचे तात्पुरते रहिवासी नसल्याचा धक्कादायक खुलासा अधिका-यांनी गुरुवारी केला. राहुल गांधी अमेठीचे तात्पुरते रहिवासीही नसल्याचे कारण सांगत त्यांना निवासी दाखला देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे.
गेल्या दोन निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीमधून निवडणूक लढवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहतो त्याचे त्या विभागात बँकेचे खाते असणे गरजेचे असते. मात्र खाते उघडण्यासाठी रहिवासी पुराव्याची गरज असते. त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र राहुल गांधी अमेठीचे तात्पुरते रहिवासीही नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज स्वत:हून जिल्हा उपविभागीय मॅजिस्ट्रेट अधिका-यांक़डे दिला नाही तर वकिलांतर्फे त्यांनी ही कागदपत्रे सादर केली. अर्ज दाखल करताना राहुल गांधींनी स्वत: यायला हवे होते. तसेच अर्जासोबत गरजेचे असलेले ओळखपत्रही त्यांनी सादर केले नाही त्यामुळेच त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत राहुल गांधींच्या विरोधात आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून अमेठीमधून राज्यसभा खासदार स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.









