
अमेरिका ही जगाची महासत्ता आहे. संरक्षण सामर्थ्यांमुळे अमेरिकेला हे स्थान निर्माण झाले आहे. लष्कर, हवाई, नौदल यांच्यासह अंतराळातील लष्करी उपग्रहांची मालिका, विविध क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आदींमुळे अमेरिका बलाढय बनली आहे. तसेच जगातील विविध बेटांवर अमेरिकेचे तळ आहेत. त्याचबरोबरच अमेरिकेच्या विमानवाहू अजस्र् युद्धनौका व पाणबुडया सर्व महासागरात गस्त घालत असतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर कोणतीही लष्करी कारवाई करायची झाल्यास अमेरिकेचे सैन्यदल तेथे पोहोचलेले असते. याच बलाढय लष्कराचे संख्याबळ कमी करण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. दुस-या महायुद्धापूर्वी लष्कराचे जे संख्याबळ होते. तेच संख्याबळ ठेवण्याचा निर्णय अमेरिकी सरकारने घेतला आहे. तसेच ‘ए-१०’ ही लढाऊ विमाने हवाई दलातून बाद करण्याचे ठरवले आहे. पश्चिम युरोपातील रशियन रणगाडे उद्ध्वस्त करण्यासाठी ही विमाने अमेरिकेने तयार केली होती.
अमेरिकी सरकारने सध्या काटकसरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे संरक्षणावरील भरमसाट खर्चाला कात्री लावण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री चक हेगेल यांच्या सैन्य कपातीच्या प्रस्तावाला पेंटागॉनचे अधिकारी अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत.सैन्यकपातीमुळे अमेरिकेचे लष्कर कोणत्याही शत्रूचा पराभव करण्यास सक्षम असले तरी एकाच वेळी दोन मोठ्या लष्करी मोहिमा राबवायची वेळ आल्यास किंवा दीर्घकालीन परकीय विळख्यातून मुक्ततेसाठी प्रयत्न करताना अमेरिकेला अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच या युद्धमोहिमांमध्ये यश मिळवण्यास विलंब लागल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होण्याचा धोका असल्याचा इशाराही, पेंटागॉनच्या अहवालात दिला आहे. संरक्षणमंत्री चक हेगेल यांच्या प्रस्तावाबाबत माहिती देताना अमेरिकी अधिका-यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची क्षमता सैन्य दलामध्ये असायला हवी. या सैन्य दलाने अमेरिकेच्या भूमीचे आणि परदेशातील मोहिमांदरम्यान अमेरिकेचे हितसंबंध जपायला हवेत. सध्या आमच्याकडे लष्कराचे आकारमान मोठे आहे. मात्र हे सैन्य युद्धकुशल, सामर्थ्यवान, अत्याधुनिक आणि उच्च प्रशिक्षीत असायला हवे. त्यामुळे केवळ आकारमानाने नव्हे तर विविध अंगांनी हे सैन्य परिपूर्ण असायला हवे, हे लक्षात घेऊन अशा प्रकारची योजना तयार केली जात आहे. ९/११च्या हल्ल्याच्या वेळी अमेरिकेची सैनिक संख्या ५,७०,००० होती. त्यामध्ये कपात करून ती ४,९०,०००पर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता येत्या काही वर्षात लष्करातील सैनिकांची संख्या ४,४०,०००पर्यंत घटवण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पेंटागॉनच्या सूत्रांनी दिली. शीतयुद्धाच्या काळात युरोप व आशियात एकाच वेळी लढण्यासाठी पेंटागॉनने सैनिकांची संख्या वाढवण्यावर भर दिला होता. सध्याच्या काळात मोठे संख्याबळ असलेल्या लष्कराची गरज उरलेली नाही.









