
भारतीय घटना प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देते. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या विरोधात टिप्पणी करण्याची काहीही गरज नसल्याची तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल्पसंख्याकांविरोधात गरळ ओकणाऱयांना दिली आहे. मोदींच्या टीकेचा रोष यावेळी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिशेने होता. मोदींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य असून, अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करता कामा नये, असा स्पष्ट संदेश मोदींनी देऊ केला. अल्पसंख्याक समाजाविरोधातील विधाने, भेदभाव किंवा हिंसा यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचे मोदींनी यावेळी कडक शब्दांत सांगितले. यासोबतच देशातील नागरिकांना अच्छे दिन आल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला. देशाला अच्छे दिन आले आहेत मात्र काही जण आमच्या कामातील केवळ उणीवा शोधून काढण्यात वेळ घालवत असल्याची टीका मोदींनी यावेळी केली.









