
यवतमाळ – ग्रंथोत्सवाच्या आमराईत गेल्या गेल्या पाडाचा आंबा अलगद समोर पडावा अन् त्या आनंदानं हिरकलेल्या वाचकांचं रसिकत्व कंच्च मोहरून यावं अगदी तसीचं यवतमाळकरांच्या कायम आठवणीत रहावी अशी भेट ग्रंथोत्सवातील काव्योत्सवात चिंब भिजलेल्या शब्दांनी रसिकांना दिली.
वऱ्हाडी साहित्याचे भूषण कविवर्य शंकर बडे यांच्या नर्मविनोदी निवेदनाने रंगात आलेल्या आणि वऱ्हाडी साहित्याचे हेडमास्तर डॉ.विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवितेच्या दरबारात दोन पिढ्यांची कहानी सांगणारा हृदयस्पर्शी कवितांचा पाझर ओसंडून वाहिला. आयुष्यातील तरल नात्यांची मांडामांड करणाऱ्या शब्दांची मुक्त उधळण झाली. ‘माय’, ‘बाप’, ‘मुलगी’, ‘गुरुजी’, असे नात्यांचे पदरांना स्पर्श करीत जीवनातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या उबदार रचनांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझवले. गजल, लावणी, विडंबन उपरोधाच्या श्रृंगाराने भारलेली काव्य मैफल अस्सल वऱ्हाडी मातीच्या सुगंधाचे वाण देणारी ठरली.
आभाय भलतं जोरात होतं
जल्माची माही तहान होती
कालचा दिसं कुवारा होता
कालची रातं जवान होती
तरुणाईच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉ.विठ्ठल वाघ यांच्या या तारुण्यसुलभ अदाकारीने घायाळ प्रेक्षकांना शंकर बढेंच्या कारुण्याने ओथंबलेल्या ‘माय’ कवितेने भानावर आणले. डोळ्यात अश्रूंची गर्दी खेचणारी त्यांची ‘माय’ सर्वांनाच चटका लावून गेली. काळजात घर करून गेली-माय कायजात वस्ती करून माय असते कासरे धरून येसन कवा खेचली नाही पुराणी कवा टोचली नाही
तिचं तंतर तिचं जाणे
डोयात तिच्या आभायाचे गाणे !
‘माय’ ची थोरवीचे आभाय रिते होत असताना अश्रूंचे ओघळ पुसणारी गजल चांदूर बाजार येथील कवि नितिन देशमुख यांनी सादर केली. जगण्याचे वास्तव चिमटीत पकडणारे त्यांचे शब्द हृदयाला पाझर फोडणारे ठरले.
अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले असते
या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते
मराठी गजलेतील नव्या पिढीचा श्वास असणाऱ्या नितिन देशमुखांनी माणुसकीला उंचीवर नेणाऱ्या रचनांची
बरसात केली. अश्रूंची फुले होत असतांना प्र.के.अत्रेच्या ‘झेंडूच्या फुलांची’ खमंग मेजवानी देणारा प्रत्यय माजलगांव (जि.बिड) चे दमदार कवी प्रभाकर साळेगावकर यांनी दिला. त्यांच्या विडंबन काव्याने राजकारणाचा ‘असली’ चेहरा चव्हाट्यावर मांडला. पिंजलेल्या जनतेच्या दु:खाची ‘गोम’ सांगणारे त्यांचे घडी-घडी सवईनं तुम्हा दिली महागाई
भरतीचा उघडला पिंजरा पोरापायी असेचं वाढो प्रेम आपुले, सुखात नांदो दलाल आम्हावर श्रेष्ठींची मर्जी बहाल!
आपल्या कवितेतून त्यांनी उपहासगर्भ चिंतन अचुकपणे प्रस्तुत केलं. तर ‘वाटोळा’ या शब्दाचा अर्थ
शाळेत शिकता आला असता तर ? हा मार्मिक प्रश्न नागठाणे (जि.सांगली) येथून आलेले कवी रमजान
मुल्ला यांनी उपस्थित केला.
लहाणपणी गुरुजी शिकवायचे
एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा
पैकी शिकविला नाही कधीचं गुरुजींनी
‘वाटोळा’ या शब्दाचा अन्वयार्थ !
रमजान मुल्ला यांनी पुढे शब्दांना सुरांचा बाज चढवित मैफलीत अनोखा रंग भरला. त्यांनी सादर केलेली ‘आई’, ‘मुलगी’ भावस्पर्शी नात्यांची वीण गुंफणारी होती. कवितेच्या खोलात जाऊन प्रभाकर साळेगावकरांनी परत शोषणाचा संदर्भ उलगडला.
‘मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात
आपल्यातल्या शोषण या शब्दांचे संदर्भ बदलू
कारण त्यांना आभाळाला पाझर फोडायचा असतो
व मातीशी इमान राखायचं असतं
वऱ्हाडी मातीची महत्ती सांगणाऱ्या कसदार कवितांनी काव्य मैफलीला आगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. रसिकांच्या काळजात घर बांधणाऱ्या या मैफलीच्या निमित्ताने मात्र मिराताई ठाकरे यांच्या शब्दांची आठवण पुन्हा एकदा टवटवीत झाली असा वऱ्हाडी वऱ्हाडी वऱ्हाडी माणूस इया, कुदय, पावडं त्यांच्या जिन्गानीचा साज हेडमास्तर ‘वाघ’ आणि ‘मास्टर’ बढे यांची शाब्दीक जुगल बंदीचे दुधात साखर घालणारी होती. मातीशी इमान राखणारी ही काव्यमैफल कविवर्य शंकर बढे यांच्या संचलनाच्या तडक्याने विशेष उल्लेखनीय ठरली. यवतमाळ ग्रंथोत्सतव आयोजन समितीच्या परिश्रमाने कवि संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपस्थितांचे आभार ज्येष्ठ कवी योगानंद टेंभुर्णे यांनी मानले.









