नवी दिल्ली- स्वतंत्र तेलंगण राज्याला मान्यता देणारे विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर होताच लोकसभेला अक्षरश: युध्दभूमीचे स्वरुप आले. तेलंगण विधेयकावरुन जोरदार गदारोळ सुरु असतानाच, तेलंगण समर्थक आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. दरम्यान लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी गोंधळ घालणा-या आंध्रप्रदेशच्या १८ खासदारांना नियम ३७४ अंतर्गत निलंबित केले आहे.
मिरचीपूड फेकणारे खासदार एल राजगोपाल यांच्यासह ध्वनीक्षेपक तोडणारे टीडीपीचे खासदार एम. वेणूगोपाल रेड्डी यांना निलंबित केले आहे. यांच्यासह सब्बम हरी, अनंथा व्यंकटरामी रेड्डी, रायपती संबासिवा राव, एसपीवाय रेड्डी, एम श्रीनिवासुलु रेड्डी, व्ही अरुण कुमार, ए साई प्रताप, सुरेश कुमार शेतकर, केआरजी रेड्डी, बापी राजू कनुमुरी आणि सुखेंदर रेड्डी (सर्व काँग्रेस) तसेच निरामली सिवाप्रसाद, निम्माला क्रिस्तप्पा, के. नारायणा राव (सर्व टीडीपी) आणि वाय एस जगनमोहन रेड्डी, एम राजामोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.
लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत या खासदारांमध्ये मारामारी झाली. या दरम्यान विजयवाडाचे निलंबित खासदार एल. राजगोपाल यांनी संसदेत मिरचीपूडचा स्प्रे फवारल्याने काही खासदारांची तब्येत बिघडली. त्यामुळे संसदेत रुग्णवाहिका बोलवून या खासदारांना रुग्णालयात नेण्यात आले. स्प्रे फवारणा-या राजगोपाल यांना अन्य खासदारांनी मारहाण सुरु केल्यानंतर संसदेतील कर्मचा-यांनी मध्ये पडून त्यांची सुटका केली. हा गोंधळ सुरु असताना टीडीपीचे खासदार के. नारायण राव चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी तेलंगण विधेयकाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. हे विधेयक संसदेत मांडण्यात आल्याने सीमांध्र भागातील तीन काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. लोकसभेत स्वतंत्र तेलंगणचे विधेयक येताच विरोधक खासादारांनी हे विधेयक हिसकावून फाडून टाकण्याचाही प्रयत्न केला.









