
माणसाला संघर्षसन्मुख करणारा हा विद्रोह आत्मसन्मानासाठीची शिकवण देतो. माणसाच्या खदखदनाऱ्या मनात संघर्षाची ठिणगी टाकतो. चळवळीतील संघर्षाची दीक्षा देतो . मनुस्मृतीच्या देशात ज्या शुद्रातीशुद्राचा जन्म झाला त्यांच्याकडे बुद्ध – आंबेडकरांचा विचार हाच जालीम उपाय असल्याची भावना या विद्रोहामागे आहे. जगण्याच्या , मुलभूत प्रश्नांच्या संदर्भात विद्रोहाचा अविष्कार होतो.
विद्रोहाच्या मुळाशी स्वातंत्र्याची उर्मी आहे असेही प्रत्ययाला येते.धर्म , संस्कृती, दांभिकता या प्रवृत्तींना नकार देऊन त्याविरोधात विद्रोह पुकारून स्वातंत्र्य या मूल्याचा स्वीकार केला जातो. प्रस्थापित मुल्यव्युव्ह नाकारून मानवी मुल्यांचा स्वीकार हि विद्रोहाची सकारात्मक स्वीकृती आहे. दलित कवितेतील विद्रोहाने अमानुषपण नाकारले आहे आणि माणूसपणाचा स्वीकार केला आहे . बुद्धिप्रामाण्यावादी विचारप्रणाली आणि स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्याय या मुल्यांची स्वीकृती हि या विद्रोहाची विधायक बाजू होय. म्हणूनच ” माणसाने पहिल्या प्रथम स्वत:ला उध्वस्त करून घ्यावे ” अश्या विध्वंसक विचारातून या कवितेचा प्रवास मानवी मुल्याकडेच होतांना दिसतो.
डॉ. महेंद्र भवरे
( दलित कविता आणि प्रतिमा )









