आता सरकारी अधिकाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

images
मुंबई दि. २९ – ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी आपल्याकडं म्हण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेफिकीर आणि बेजबाबदार मनोवृत्तीमुळं आताच्या ई जमान्यातही सर्वसामान्यांना या म्हणीचा प्रत्यय येत असतो. याच ‘बाबूगिरी’ला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी अभिनव मार्ग शोधला आहे. सरकारी कार्यालयांत सीसीटीव्ही बसवून अधिकाऱ्यांच्या कामावर वॉच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सर्वसामान्य लोकांना तसेच लोकप्रतिनिधींना या ना त्या कारणानं सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या वेळा घ्याव्या लागतात. मात्र, अनेकदा आधी वेळ घेऊन आणि तासन् तास वाट पाहूनही अधिकारी लोकांना भेटत नाहीत. त्यांच्या अडचणी ऐकून घेत नाहीत. याबाबतच्या असंख्य तक्रारी आल्यामुळं पालकमंत्री तावडे यांनी उपनगरातील सर्व कार्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये तसेच केबिनबाहेरील वेटिंग रूममध्ये लावण्यात येणार आहेत. त्यामुळं अधिकारी आपल्या कर्तव्ये योग्य पद्धतीनं पार पाडतात की नाही, हे समजू शकणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली असून येत्या मार्चपासून ते बसविण्यास सुरुवात होणार आहे. दर महिन्याला त्यातील फुटेजचा अभ्यास केला जाईल, असे उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− five = 2