आमदारांचा रेल्वेत गोंधळ‍

57558-railwa
नागपूर – साधेपणाचे उदाहरण देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्पेशल फ्लाइटने प्रवास करण्याचे टाळतात. मात्र, राज्याच्या पाच आमदारांनी रेल्वेच्या एसी डब्यातील प्रवासाकरिता शुक्रवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला. इतकेच काय तर स्वतःच्या सोयीसाठी प्रवाशांना वेठीस धरत तब्बल दहावेळा चेन पुलिंग केली. या गोंधळात ही गाडी मुंबईला पोहोचण्यास तब्बल चार तास उशीर झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
सेवाग्राम एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास सुटण्यास सज्ज होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन दिवस सुटी असल्याने अनेक आमदारांनी घरची वाट धरली. मात्र, पाच आमदारांना स्लीपर क्लासची तिकिटे मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याकरिता रेल्वेने एसीचा वेगळा डबा जोडावा, असा आग्रह या आमदारांनी धरला. ‘रेल्वे प्रशासनाने हा आग्रह मान्य न केल्याने या आमदारांनी चक्क दहा वेळा चेन पुलिंग केली. त्यामुळे ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटण्यास उशीर झाला. तसेच वर्धा रेल्वेस्थानकावरूनसुद्धा ही गाडी उशिरा सुटली. यामुळे पुढील वाहतुकीच्या वेळांमध्ये फरक पडल्याने ही गाडी मुंबईला चार तास उशिरा पोहोचली,’ अशी माहिती या गाडीतील प्रवासी नीलेश वाणी यांनी दिली. ‘या गाडीकरिता अनेक आमदारांनी एसी कोचमध्ये आरक्षण मागितले होते. परंतु नागपूर स्थानकाचा व्हीआयपी कोटा संपल्याने केवळ पाच आमदारांना एसी क्लासमध्ये आरक्षण न देता स्लीपर क्लासमध्ये देण्यात आले. त्यामुळे या आमदारांनी एसी डब्याची मागणी केली. परंतु, प्रत्येक गाडीची डबे खेचण्याची एक विशिष्ट क्षमता असते आणि या गाडीला नवा कोच जोडणे आम्हाला शक्य नसल्याने आमदारांच्या मागणीला नकार देण्यात आला. यादरम्यान चेन पुलिंगसुद्धा झाले. परंतु ते आमदारांनीच केले काय, हे सांगता येणार नाही. या गोंधळात गाडी नागपूर स्थानकाहून २० मिनिटे तर वर्धा स्थानकाहून १० मिनिटे उशिरा सुटली’, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 3 = three