
मुंबई – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक कलाकार आणि क्रीडापटू निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात आता बॉलीवूडची आयटम गर्ल राखी सावंतहीचा देखील समावेश झाला आहे. अन्य कलाकारांप्रमाणेच राखीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राखी वायव्य मुंबईमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
वायव्य मुंबईमधून राखी सावंत काँग्रेसचे गुरुदास कामत, शिवसेनेचे गजानन किर्तीकर, आपचे मयांक गांधी आणि मनसेचे महेश मांजरेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे.राखीला भाजपकडून उमेदवारी हवी होती. त्यासाठी तिने दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयाला भेटही दिली. मात्र भाजपने तिला मुंबईसाठी उमेदवारी नाकारत श्रीरामपूरमधून तिकीट देऊ केले. भाजपने तिकीट नाकारल्याने राखीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत या उमेदवारांना जोरदार टक्कर देणार असल्याचाही विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.









