
नवी दिल्ली- आयपीएलच्या सातव्या हंगामाची अंतिम लढत मुंबईत एक जूनला वानखेडे स्टेडियमवर रंगेल. आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात होणार असून त्याला दोन मेपासून सुरुवात होईल, असे बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केले.
मुंबई इंडियन्स गतविजेता असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) अंतिम लढत खेळवण्याचा मान मिळाला. ‘फायनल’बरोबर मुंबई इंडियन्सच्या लढती तसेच ‘क्वालिफायर २’ लढतही (३० मे रोजी ) मुंबईत होईल. मुंबईतील पहिली लढत तीन मे रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगेल. आयपीएलच्या दुस-या टप्प्यात ३६ सामने आणि चार ‘प्ले ऑफ’ लढतींचा समावेश आहे. पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) १६ ते ३० एप्रिलदरम्यान खेळला जाणार आहे. सार्वत्रिक दुसरा टप्पा बांगलादेशात तसेच तिसरा टप्पा भारतात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळची आयपीएल दोन टप्प्यांतच होईल. तसेच दुसरा टप्पा भारतात होईल, यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले.









