‘
मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) प्रवाशांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र एसटीची ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गतचा प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. या योजनेतील चार व सात दिवसांच्या पासच्या किमतीत २५ ते ४० रुपयांनी वाढ होणार आहे.
एसटीच्या ताफ्यात सुमारे १७ हजार बस आहेत. प्रवाशांना प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना सुरू केली. प्रवाशांचाही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेंतर्गत चार व सात दिवसांचा पास दिला जातो. पासमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली.
मात्र वाढत्या महागाईमुळे एसटीने या पासची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. इंधनाबरोबरच गाडय़ांच्या सुटय़ा भागांचे भावही वाढल्याने एसटीला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तिकीटदरातील वाढीपाठोपाठ सवलतीच्या पासमध्येही दरवाढ करण्यास एसटीला भाग पडत आहे, असे एसटीच्या अधिका-याने सांगितले. मात्र ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गत १ एप्रिल पूर्वी पास काढला असल्यास त्या संबंधित प्रवाशांकडून पूर्वीचेच दर आकारले जाणार आहेत.









