
गुवहाटी- मतदानाबाबत नेहमी जागरुकता दाखवणा-या आसाम आणि त्रिपुरा राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने मतदान केले. लोकसभा निवडणुकीत्या पहिल्या टप्प्यात आसाममधील १४ पैकी पाच जागांसाठी तर त्रिपूरामधील दोन पैकी एका जागेवर मतदान पार पडले. आसाममध्ये ७२ टक्के मतदान तर तर त्रिपुरामध्ये ८४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. याआधी म्हणजे २००९साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आसामध्ये १४ जागांसाठी ६९.६८ टक्के तर त्रिपुरामधील दोन जागांसाठी ८३.९१ टक्के मतदान झाले होते.
आसाममधील तेजपुर लोकसभा मतदारसंघामध्ये ७३ टक्के, जोरहाटमध्ये ७५ टक्के, लखीमपूरमध्ये ६७ टक्के, दिब्रुगडमध्ये ७० टक्के आणि कोलियाबोरमध्ये ७२ टक्के मतदान झाले आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. पहिल्या टप्प्यात एकूण दहा हजार मतदान केंद्रावर ६४.४ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच वाजल्यानंतरही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती.
आसाममध्ये १८ ते १९ वयोगटातील प्रथमच मतदानाचा हक्क बजावणा-या मतदारांची संख्या साडेसहा लाख इतकी आहे. तेजपुर, कालियाबोर, दिब्रुगड आणि लखीमपुरमधील वेगवेगळया मतदान केंद्रावरील ३३ मतदान यंत्रे बिघडली होती. त्यातील २९ मतदान यंत्रे बदलण्यात आली असून, चार मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्याने तेथील मतदान सुरळीत पार पडले. कालिबोर लोकसभा मतदारसंघातील सारपाटहार मतदान केंद्रावर मतदान करण्यावरुन सीआरपीएफच्या जवानांबरोबर झालेल्या हाणामारीत चारजण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे.









