
नाशिक – महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करण्याच्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या भूमिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘मराठी शाळा टिकवण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करणं हा पर्याय होऊ शकत नाही. त्यापेक्षा मराठी शाळांतच उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय असावी,’ असं मत राज यांनी व्यक्त केलंय.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी नेमाडे यांनी महाराष्ट्रात मराठी भाषेतूनच मुलांचं शिक्षण व्हायला हवं. येथील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करायला हव्यात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज यांनी काहीशी संयमी भूमिका मांडली. ‘उत्कृष्ट मराठी शाळा आणि त्यात उत्कृष्ट इंग्रजी शिक्षण ही महाराष्ट्राची खरी गरज आहे. मराठी शाळांमध्ये इंग्रजीचं चांगलं शिक्षण दिल्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची गरजच लागणार नाही. मराठी माणसं स्वत:च मुलांना त्या शाळांमध्ये घालणार नाहीत,’ असं राज म्हणाले. याशिवाय महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक मिळणंही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.









