
आर्णी , दि. ६ – माहुर येथून दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना इंडीका झाडावर आदळली. यामध्ये एक युवती जागीच ठार असून तीन जण जखमी झाले. दहिसावळी येथे आज शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली.
आरती बाबुसिंग जाधव (१९) असे मृतक युवतीचे नाव आहे. तर अतीष संजय जाधव (२२), टिना रमेश राठोड (२०), आकाश बाबुसिंग जाधव (२५) रा. घाटकिन्ही ता. दारव्हा अशी जखमींची नावे आहे. एम.एच. २९ / १७८६ क्रमांकाच्या इंडीकाने ते माहुर येथे रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते लोणबेहळ येथे परत आले. त्यावेळी गाडीतील एकाचा मोबाईल माहुर येथे हॉटेलमध्ये विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथून पुन्हा माहुर येथे गेले. तेथून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंडीका दहिसावळी जवळ झाडावर आदळली. यामध्ये आरती, अतीष, टिना, आकाश हे जखमी झाले. तर आरतीचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमीवर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. महामार्ग पोलीस अजय डोळे, चालक दिपक चातारकर यांच्यासह बाबाराव गावंडे, निलेश आचमवार यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.









