नवी दिल्ली – भारतीय मच्छिमारांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन इटालयिन खलाशांवर चाचेगिरीविरोधातील कायद्याअंतर्गत खटला चालवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. यासाठी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत केद्र सरकारला मुदत देण्यात आली आहे.
इटालिय खलाशांवरील खटल्यासंदर्भातील अडथळे दूर करुन १० फेब्रुवारीला केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायमूर्ती बी.एस.चौहान यांच्या खंडपीठाने सोमवारी दिले. अँटर्नी जनरल गुलाम ई वाहनवटी यांनी केंद्राने यासंदर्भातील जवळपास सर्व त्रुटी दूर केल्या असून पुढील सुनावणीमध्ये भूमिका स्पष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी दोन भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केल्याप्रकरणी इटलीच्या लटोर्रे मॅसिमिलियानो आणि सॅल्वाटोर गिरोन या दोन खलाशांना अटक झाली होती. त्यांनी केलेल्या गोळीबारात अजेश बिंकी आणि जेलेस्टाईन हे दोन मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणी दोन्ही खलाशांवर केरळ उच्च न्यायालयामध्ये हत्येचा खटला सुरू आहे.









