
पर्थ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही भारतीय संघाचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या सहका-यांनी द.आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयाचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता अशी भारताच्या विजयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वचषकात यापूर्वी भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तीन लढतीत एकदाही भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र रविवारी झालेल्या विश्वचषकाच्या लढतीत भारताने दिमाखदार विजय मिळवत पराभवाची मालिका खंडित केली.
‘भारत इतक्या मोठ्या फरकाने द.आफ्रिकेविरुद्ध विजय मिळेल याचा कधीच विचार केला नव्हता. मला नेहमीच संघाच्या प्रदर्शनाबाबत आत्मविश्वास होता. मी सुरुवातीपासून हेच सांगत होतो की सलामीवीरांनी सामन्याच्या सुरुवातीला घाई करु नये. मात्र दुर्देवाने रविवारच्या सामन्यात रोहित शर्मा धावचित झाला. त्यानंतर विराट आणि शिखर यांनी सावध फलंदाजीस सुरुवात केली. २४ षटकानंतरच त्यांनी मोठे शॉटस खेळण्यास सुरुवात केली.’
‘मला वाटले होते की भारत ३० ते ४० धावांनी विजय मिळवेल. ३०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणा-या द.आफ्रिका संघाला भारत २७०-८० पर्यंत रोखेल. मात्र या सामन्यात भारताने १६० धावांवर त्यांचा डाव रोखला. भारताने जो काही विजय मिळवला तो खरंच अनाकलनीय आहे,’ असे गावस्कर यावेळी म्हणाले. द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त १३७ धावांची खेळी करणा-या शिखर धवनचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.









