
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातील राज्यमंत्रीपद असलेल्या ३६ मंत्र्यांना नारळ दिला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्यांवर कारवाई केली असेली तरी त्यांनी स्वतः राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमधील ८० पैकी केवळ पाच जागांवर विजय मिळाला होता. याआधी त्यांनी ३५ जागांवर विजय मिळवला होता. निवडणुकीतील या पराभवानंतर अखिलेश यांनी ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्र्यापाठोपाठ आणखी काही कॅबिनेट मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या या खराब कामगिरीनंतर अखिलेश यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्यांनी राजीनामा देणार नसून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत राज्यातील ८० पैकी ७१ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजपने आघाडी केलेल्या अपना दल या पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे.









