
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (१२ एप्रिल) शनिवारी होणार आहे. या टप्प्यात चार राज्यातील सात लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सात एप्रिल रोजी सुरु झाली होती. १० एप्रिल रोजी तिस-या टप्प्यातील मतदान झाले असून या तिन्ही टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले आहे. चौथ्या टप्प्यात गोवा, आसाम, त्रिपूरा आणि सिक्कीम या चार राज्यातील सात जागांवर मतदान होणार आहे. या सात जागांवर ७४ उमेदवार उभे आहेत. गोव्यात लोकसभेच्या केवळ दोनच जागा असून या ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, सीपीआय आणि अन्य प्रादेशीक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात काँग्रेसकडून रवी नाईक तर आपने दत्ताराम देसाई हे प्रमुख उमेदवार आहेत.दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या ऐवजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड याने उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि आपचे स्वाती केरकर हे प्रमुख उमेदवार आहेत.सिक्कीममधील लोकसभेच्या एका जागेबरोबरच विधानसभेच्या ३२ जागांसाठी मतदान होणार आहे. आसाममधील दुस-या टप्प्यात तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. आसाममध्ये याआधी पाच लोकसभा मतदारसंघात सात एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर त्रिपुरामध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे. राज्यात लोकसभेच्या दोन जागा असून सात एप्रिल रोजी येथे पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते.









