
ठाणे – अंबरनाथ एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीच्या टॅंकरने शनिवारी रात्री उशिरा उल्हास नदीमध्ये विषारी रसायन सोडले. हे रसायन पाण्यात मिसळल्याने विषारी वायू तयार झाला.
या विषारी वायूची बाधा होऊन उल्हासनगरमध्ये शंभरपेक्षा अधिक नागरीक आजारी पडले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास नागरीकांना अचानक श्वासो श्वासाचा त्रास सुरु झाला. पोटात मळमळणे, उलटया, डोळयांची आग असे त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.
लगेचच या सर्व नागरीकांना उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
विषारी रसायन नदीमध्ये सोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसीमधून अशा प्रकारे कायदा आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून विषारी रसायने नदीमध्ये सोडली गेली आहेत. मात्र पोलिस आणि अन्य यंत्रणांकडून अशा घटनांकडे डोळेझाक केली जाते.









