
आर्णी – पैसे घेवून ऊस तोड कामगार पळून गेल्यानंतर कंट्राटदाराने एजंटचे अपहरण केल्याची घटना घडली होती. अपहरण कर्त्याने कर्नाटकातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील सुभाष नारायण आडे (३०) याने कर्नाटकातील ऊस कारखान्याला मजूर पुरविण्याचे काम घेतले होते. त्यासाठी मजुरांचा शोध घेवून १० कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे अॅडव्हांस देण्याचे ठरले होते. कमिशन म्हणून सुभाषला दहा हजार रुपये मिळणार होते. २ डिसेंबर रोजी सर्व मजूर आर्णी येथील दर्गाजवळ आले. दहाही कामगारांनी प्रत्येकी दहा हजार घेतले आणि पळून गेले. यामुळे बाळू देवानंद चव्हाण चांगलाच संतापला. त्याने सुभाषचे अपहरण करून कर्नाटकात नेले. याप्रकरणाची तक्रार नारायण तायडे यांनी आर्णी पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. गणेश हिरूळकर, रमेश वीर यांचे पथक १५ डिसेंबर रोजी सुभाषच्या शोधात कर्नाटकात गेले. मात्र या पथकाच्या हाती काही लागू न शकल्याने रिकाम्या हाताने परत यावे लागले. विजापूर जिल्ह्यातील आलमेल पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया गावातील पोलीस पाटील आरोपीच्या संपर्कात असल्याने आरोपी निसटल्याचे पोलीस सांगत आहे. मोठ्या शिताफीने सुभाषने अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. आरोपी माझ्या दोन्ही किडन्या विकणार होता, असे खळबळजनक बयान त्याने पोलिसांना दिले आहे. अपहृत व्यक्ती सुखरूप परतला असला तरी आरोपी मोकाट असल्याने त्याला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









