
मेलबर्न – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून आणि एक षटक राखून भारताचे २६८ धावांचे लक्ष्य पार केले. ऑस्ट्रेलियाचा तिरंगी मालिकेतील हा सलग दुसरा विजय असून, भारताची मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली आहे.
शेवटच्या तीन षटकांमध्ये दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. ब्रॅड हॅडीन आणि जेम्स फॉकनर या जोडीने ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. ऑस्ट्रेलियाकडून एरॉन फिंचने सर्वाधिक (९६) धावा केल्या.
भारताने ठेवलेल्या २६८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. संघाचे अर्धशतक पूर्ण झाले त्यावेळी डेविड वॉर्नरच्या रुपाने भारताला पहिले यश मिळाले.
त्यानंतर आलेल्या वॉटसन ४१ धावा करुन बाद झाला. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरला. फिंचने स्मिथच्या साथीने तिस-या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी साकारली. स्मिथला अर्धशतक पूर्ण करण्यास तीन धावा हव्य असताना अश्विनने त्याला बाद केले. त्यानंतर शतकाच्या दिशेने वाटचाल करणा-या फिंचला उमेश यादवने ९६ धावांत रोखले.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला होता. भारताने सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतक आणि सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर आठ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकात २६७ धावा केल्या.
भारताने फलंदाजीस सुरुवात केल्यानंतर पहिल्याच षटकात भारताला शिखर धवनच्या रुपात धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वारंवार संधी मिळूनही चांगली खेळी कऱण्यात अपयशी ठरलेला शिखर धवन याही सामन्यात साफ अपयशी ठरला. सलामीला मैदानात उतरलेला शिखर धवन केवळ दोन धावा करुन तंबूत परतला. स्टार्कच्या गोलंदाजीवर तो फिंचकडे झेल देत बाद झाला. तर अजिंक्य रहाणेही १२ धावा करुन बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेत तडाखेबाज शतकी खेळी साकारणारा आक्रमक विराट कोहलीनेही निराशा केली. त्याने नऊ धावा केल्या. त्याला आस्ट्रेलियाच्या फॉकनरने बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाच्या साथीने रोहितने डावाला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची महत्वाची भागीदारी साकारली.
सुरेश रैनाने ५१ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर रोहितने मेलबर्नच्या मैदानावर दमदार शतक साजरे केले. १३९ चेंडूत त्याने १३८ धावा केल्या. परदेशी भूमीवरील तिसरे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे चौथे शतक आहे. रैनानंतर आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी १९ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने रोहितसह ५१ धावांची भागीदारी केली. अश्विन पटेल आणि भुवनेश्रर कुमार भोपळा न फोडताही माघारी परतले आणि भारताचा डाव २६७ धावांवर संपुष्टात आला.









