कमी खर्चात आणि कमी वेळात न्याय मिळावा- न्या.भुषण गवई

ठाणे : देशाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे असा घटनेत उल्लेख आहे. शहापूर तालुक्यातील खेड्या-पाड्यातून तसेच दुर्गम भागातील लोकांना कमी खर्चात आणि कमी वेळात न्याय मिळावा यासाठी न्यायालयाची इमारत प्रेरणादायी ठरावी, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांनी व्यक्त केली.
शहापूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारत उदघाटन प्रसंगी न्या.गवई बोलत होते. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होते. न्या. प्रतिभा शेजवळ-काळे, ॲड.जगदीश घोरपडे, ॲड.प्रमोद पाटील, आमदार दौलत दरोडा यांची यावेळी उपस्थिती होती. शहापूर येथे सुंदर आणि सर्वसोईने अद्ययावत इमारत उभारण्याबद्दल त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही या न्यायालयात काही काळ काम केले असल्याने या न्यायालयास वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. घटनेमुळे नागरिकांना अनेक अधिकार मिळाले आहेत. पत्रकार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी एकत्र आल्यामुळे एक सुंदर वास्तु निर्माण झाली असल्याचे न्या.गवई यांनी सांगितले. 30 वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे न्यायालयाची इमारत पूर्ण झाली. त्यामुळे एक वेगळा आनंद सर्वांना मिळाला आहे, असे सांगून न्या.सोनवणे म्हणाले की, या ठिकाणी वरिष्ठस्तर न्यायालय सुरु करणे गरजेचे आहे. पत्रकारांचे हित आणि त्यांच्या सोईसाठी इमारत उभारली असून या ठिकाणी स्वच्छता राखावी. या इमारतीत पक्षकार, वकील, पोलीस यांच्यासाठी वेगवेगळे कक्ष असून संगणीकरणामुळे पक्षकारांना प्रवेशदारावर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ॲड.प्रमोद पाटील आणि जेष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दिप प्रज्वलीत करुन आणि फीत कापून इमारतीचे उदघाटन झाले. पाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले शेवटी न्या. प्रतिभा शेजवळ-काळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय सोळंकी, तहसीलदार शहापूर, ठाणे जिल्ह्यातील न्यायीक अधिकारी, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 5 = eight