कसारा घाटात अपघातात ३ ठार

इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गावर ठाणे येथून नाशिककडे जाणारी महिंद्र पिकअप दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एक वर्षीय बालकाचा समावेश आहे. जखमींना नाशिक जिल्हा रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाणे येथून महिंद्र अॅन्ड महिंद्रा कंपनीची नवी कोरी पिकअप गुवाहटी (आसाम) कडे जात होती. कसारा घाटात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक भिंत तोडून पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात कसारा येथील कामडी पाड्यावरील सखाराम वले (वय ४५), चंद्रभागा तुकाराम सदगीर (वय ५५) आणि एक वर्षीय बालकाचा (नाव समजले नाही) मृत्यू झाला. सुनिता दत्तू बेनके (वय 3५), गणेश गायकवाड राहणार बऱ्हाणपूर, खंडू बांगर (वय ५५) खर्डी , वाहनचालक हबीब शेख (वय २६) राहणार चाळीसगाव, भास्कर राठोड (वय ४८) राहणार ढेकू तालुका नांदगाव, आरती वले (वय ४०) कामडीपाडा, कसारा हे प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे लिमिटेड कंपनीच्या कर्मचा-यांनी जखमींना स्ट्रेचरच्या साहाय्याने बाहेर काढून इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्‍णालयात हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ six = 9