काँग्रेसकडून राज्यपालांची माफी

index.jpeg0
मुंबई -विधानभवनात गाडी अडवण्याचा केलेला प्रकार आणि त्या गदारोळात झालेल्या धक्काबुक्कीबद्दल काँग्रेस आमदारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची क्षमा मागितली आहे. राज्यातील भाजप सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करायला सांगावं, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली, तेव्हाच झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गेल्या बुधवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विधानसभेत ‘विश्वास’ जिंकला. परंतु, त्यांनी आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं राजकारणात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपनं नैतिकता गुंडाळून ठेवली, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचा ठपका बसू नये म्हणून आवाजी मतदानाची खेळी केली, अशी टीका शिवसेना आणि काँग्रेसनं त्याच दिवशी केली. या विश्वासमताच्या विरोधात राज्यपालांकडे दाद मागून, सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं होतं. त्यानुसारच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळानं राजभवनवर सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता आलेलं नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश आपण द्यावेत, अशा आशयाचं निवेदन काँग्रेसनं राज्यपालांना दिलंय. बहुमत सिद्ध होईपर्यंत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यास त्यांना संमती देऊ नये, अशी आग्रही सूचनाही त्यांनी केली आहे. त्याचवेळी, विधानभवन परिसरात केलेल्या गोंधळाबद्दल काँग्रेसनं राव यांची माफी मागितली. भाजपनं आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदारांनी राज्यपालांची गाडी अडवली होती आणि त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी पाच काँग्रेस आमदारांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − 6 =