
मुंबई – राज्यातील पाच अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असून येत्या आठवड्याभरात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास 25 माजी आमदार पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
भाजप-शिवसेना युतीचं सरकार मजबूत असल्याचा दावा करत मित्र पक्ष असलेला पक्षामध्ये सुरंग लावायचा नाही अथवा त्यांची माणसे फोडायची नाहीत असं आम्ही ठरविले आहे. त्यामुळे इतर पक्षांतून भाजपला पोषक असणारी, संघटनेला बळ देणारी माणसं जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. वाशिम मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि सभापती यांच्यासह पदाधिकार्यांनी काल (शनिवारी) दानवे यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या युती होणार, हे मी आधीच स्पष्ट केलं होतं. पण वरच्या पातळीवर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर युती करावयाची की नाही याचे अधिकार स्थानिक पदाधिकार्यांकडे आहेत. युतीमध्ये स्थानिक पातळीवर योग्य जागावाटप होतं काय, यावरही या युतीचे भवितव्य अवलंबून राहील, असं दानवे म्हणाले.









