» सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन
» १०० दिवसात महागाई कमी करणार
» पाच वर्षात ७५ हजार मेगावॅट वीज निर्मिती करणार
» महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच आश्वासन
» आरोग्य सेवा कायदेशी अधिकाराच्या कक्षेत आणणार
» वीस वर्ष भाडयाच्या घरात राहिल्यानंतर मालकी हक्क देण्याच आश्वासन
» १० हजार लोकांशी चर्चा करुन तयार केला जाहीरनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – सर्वसमावेशक विकासाचे वचन देत काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणूकीसाठी बुधवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वसाने पूर्ण केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
मागच्या पाच महिन्यात समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी चर्चा करुन हा जाहीरनामा तयार केल्याचे राहुल यांनी सांगितले. जाहिरनामा तयार करताना पहिल्यांदाच आम्ही लोकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. जाहीरनामा तयार करताना नेत्यांबरोबरच नव्हे तर शक्य असलेल्या प्रत्येक घटकांबरोबर चर्चा केली. व्यावसायिक आणि गरिबांकडे दुर्लक्ष करुन आपण विकास साध्य करु शकत नाही असे राहुल म्हणाले. विरोधकांपेक्षा आम्ही जास्त विकास करुन दाखवला आहे. आज आपण गुजरात मॉडेलबद्द ऐकतो पण ते एकच मॉडेल आहे. समानतेने सर्वांचा विकास करण्याचे मॉडेल काँग्रेसकडे आहे असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये रोजगार निर्मितीबरोबर विकासाची दूरदृष्टी असल्याचे मनमोहन यांनी सांगितले.यंदाच्या निवडणुकीत चांगली धोरणे आणि प्रशासन कोण देतो हे महत्वाचे ठरणार आहे. या जाहीरनाम्यात आम्ही आरोग्याबरोबर घराचा अधिकार देण्याचेही आश्नवासन दिले आहे. ज्येष्ठांना निवृत्ती वेतनाचाही अधिकार देणार आहोत. चांगल्या धोरणांबरोबरच नागरिकांचे सवैधानिक अधिकारही महत्वाचा असल्याचे सोनियांनी सांगितले.










