भिवंडी- देशात मनरेगा, अन्नसुरक्षा विधेयक, लोकपाल विधेयक मंजूर करुन काँग्रेसने गरीवांना आधार दिल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भिवंडी येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितले. आपला पक्ष श्रीमंतांचा नाही तर गरीबांचा आहे. देश पुढे न्यायचा असेल तर गरिबांचे ऐकावे लागेल, महिलांनाही आता मागे न रहाता प्रत्येक बाबतीत पुढाकार घ्यावा लागेल, असे मतही राहुल यांनी यावेळी व्यक्त केले.
काँग्रेसचे विचार या देशाच्या मातीत रुजले आहेत. काँग्रेसनेच देशातील गरीबांचा विचार करुन देशात मनरेगा, अन्नसुरक्षा विधेयक, लोकपाल विधेयक मंजूर केले. या सगळ्या उपायांमुळे भारतातील गरीबांना काँग्रेसने आधार दिल्याचे राहुल म्हणाले.
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, त्यांची आरएसएस संदर्भात काय मते होती हे सगळ्यांना माहित आहे, परंतु भाजपाचे नेते लोकांची दिशाभूल करत असल्याचे गांधी म्हणाले. ज्या लोकांनी गांधीजींची हत्या केली, त्याच संघाचा पाठींबा असलेल्या भारतीय जनता पार्टीचे लोक आज गांधीजींच्या नावाचा वापर करत असल्याची टिकाही राहूल गांधी यांनी केली.









