काकासह दोन पुतण्यांना जलसमाधी

anjarle1
चाळीसगाव , दि. ९ (प्रतिनिधी) – धोकादायक वळणावर कारवरील ताबा सुटून जामदा डाव्या कालव्याजवळील पाण्यात कार उलटल्याने पाचोरा तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तिघेही उच्चशिक्षित असून, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांच्या कुटुंबातील होते. या तिघांवर मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंबे वडगाव येथील खासगी पशू चिकित्सक भूषण पाटील व त्यांचे पुतणे निखील पाटील (२९) व उमेश पाटील (२८) हे तिघे सोमवारी जळगाव येथे कामानिमित्त गेले होते. निखील व उमेश हे दोघे वडिलांचा ठेकेदारी व्यवसाय सांभाळतात. या दोघांचे जेसीबी धरणगाव येथे कामावर देण्यात आले होते. त्या जेसीबीसाठी लागणारे ऑइल देण्यासाठी धरणगाव येथे हे तिघे गेले होते. आपले काम आटोपून रात्री ११ च्या सुमारास पाचोऱ्याकडे येत असताना पारोळा-धरणगाव दरम्यान नालबंदी गावाजवळील वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट जवळून वाहणाऱ्या जामदा डाव्या कालव्यात जाऊन उलटली, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघांशी रात्री संपर्क न झाल्याने नातेवाईकांसह पोलिसांनी रस्त्याने शोध घेतला असता त्यांचा अपघात झाल्याचे लक्षात आले. या तिघांवर त्यांचे मूळ गाव असलेल्या वाडी शेवाळी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघे उच्च शिक्षित असून निखिलला ११ महिन्यांचा मुलगा आहे आणि उमेशला ६ महिन्यांची मुलगी आहे. पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांचे भूषण पाटील हे चुलत भाऊ तर निखील आणि उमेश हे पुतणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × = six