
यवतमाळ – लग्न समारंभ आटोपून यवतमाळकडे परत येत असताना भरधाव कार झाडावर आदळल्याची घटना आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता खानगाव (फाटा) घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन मुलांसह सहाजण गंभीर जखमी झाले.
आशा अंगद राजाभोज (५८)रा. श्याम सोसायटी, असे मृत महिलेचे नाव आहे. महेंद्र अंगद राजाभोज (४२) रा. श्याम सोसायटी, कविता अंगद राजाभोज (३०), मंजुषा विवेक शाहू (३०)रा. इंदोर, हिमांशू महेंद्र शाहू (७), आयुषी विवेक शाहू (२),वेदायू महेंद्र राजाभोज, अशी जखमींची नावे आहे. महेंद्र राजाभोज हे स्वत: वाहन चालवित होते. त्यांचा अँग्लो हिंदी हायस्कूलजवळ फोटो स्टुडिओ आहे. राजाभोज कुटुंबीय चंद्रपूर येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. रात्री हा समारंभ आटोपल्यानंतर सकाळी चंद्रपूर येथून एम.एच.०२/पीए-९१९६ क्रमांकाच्या सँट्रो वाहनाने यवतमाळकडे परत येत होते. दरम्यान महेंद्रला रात्रीच्या जागरणामुळे डुलकी येत होती. त्यामुळे काही वेळासाठी वाहन थांबविण्याचा सल्ला कुटुंबियांनी दिला. मात्र यवतमाळ अगदीजवळ असल्याचे सांगून पुढील प्रवासाला निघाले. खानगाव(फाटा) येथे पोहोचत नाही तोच डुलकी आल्याने त्यांचे भरधाव वाहन झाडावर जावून आदळले.









