यवतमाळ , दि. ११ – येथील दवाबाजारनजीक असलेल्या जलाराम ट्रेडर्सला आज रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत ५० लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले असून, दोन बंब पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली.
शहरातील दबाबाजारनजीक अमित गडेचा रा. अवधुतवाडी यांचे जलाराम ट्रेडर्स आहे. आज त्यांची दुकान बंद होती. दरम्यान दुपारच्या सुमारास दुकानातून परीसरातील लोकांना धुर निघताना दिसला. दुकानाला आग लागली असावी असा अंदाज नागरीकांनी बांधून गडेचा यांना फोनवर माहिती दिली. यावेळी अग्नीशामन दलाला पाचारण करण्यात आले. दोन बंब पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत शेतीउपयोगी औषध व खत आदी ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.









