नागपूर (सुरेश चरडे ) – कॉंग्रेस ओबीसी यात्रा तर काढू शकते. परंतु ओबीसीला पंतप्रधान करू शकत नाही. म्हणूनच भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ओबीसी वर्गातील गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना घोषित केल्यानंतर कॉंग्रेसची पंचाईत झाली आहे. कारण कॉंग्रेस एखाद्या शिखाला पंतप्रधान करू शकेल. एखाद्या मुसलमानाला करू शकेल. परंतु ओबीसीला पंतप्रधान करू शकणार नाही.
कारण आता तर राहुलला पंतप्रधान करायचा आहे. त्यामुळे एका ओबीसीला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याला पर्याय ते देऊ शकत नाही. असे जर करेल तर मग कॉंग्रेसच्या राजकुमाराचा राज्याभिषेक कसा होऊ शकेल? संघ, भाजप हे वर्णवर्चस्ववादी आहेत, त्यांनी ओबीसीला पाताळात गाडले. त्यांचा विकास गोठवला, त्यांना कर्मकांडात गुंतवून ठेवले. त्यामुळे जातीयवादी, धर्मवादी भाजपापासून दूर राहण्याचे आवाहन करीत धर्मनिरपेक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या मतदाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या त्यांच्या आवाहनावरून लोकांचा असा समज होतो की कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नेते किती परिवर्तनवादी किंवा समतावादी आहेत. ब्राम्हणी व्यवस्थेला माणणारे नाहीत. त्यांना पूजेसाठी ब्राम्हण लागत नाही. ते ज्योतिष पाहात नाही. कुंडली पाहात नाहीत. अशाप्रकारचे किती कॉंग्रेसी आहेत? जर नाहीत तर त्यांना मग अशाप्रकारचा कांगावा करण्याची गरज काय आहे? भाजपा वर्णवर्चस्ववादी असली तरी त्यांना आता ओबीसीशिवाय दुसरा पर्याय नाही. कॉंग्रेसमध्ये अशी स्थिती आहे काय? तिथे राजकुमार तयार गुडघ्याला बाशिंग बांधून. तिथे दुसºयाला काय संधी आहे? म्हणून मग त्यांना आता ओबीसी यात्रा काढत आहे. ओबीसींना आपल्याकडे वळवण्यासाठी कॉंग्रेसकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओबीसींची मते घेण्यासाठी यात्रा काढण्याशिवाय दुसरे करणार तरी काय?
———-
मुत्तेमवारांची हातघाई
नागपुरात कॉंग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार पाचव्यांदा नागपुरातून खासदारकीसाठी उभे आहेत. चारवेळा जिंकून आल्यानंतर या खासदाराने नागपूरच्या विकासासाठी काय केले, हा प्रश्न आहे. तरीपण यावेळेसही पाचव्यांदा नागपुरातून ते लोकसभेची लढाई लढत आहे. याआधी ते चिमुरमधून तीनवेळा निवडणूक लढले. एवढे सारे असताना या खासदाराने विदर्भात कोणते
विकास कामे केली हा प्रश्नच आहे. ज्या जनवादच्या भरोश्यावर राजकारणात काही भव्य दिव्य केले नसले तरी टिकून राहिले त्या जनवाद या वृत्तपत्राला हा खासदार चालवू शकला नाही. इतर विकासकामे तर सोडून द्या. असे असतानाही हा व्यक्ती पुन्हा खासदार बनण्याचे स्वप्न पाहात आहे. नागपूरकर त्यांना निवडून देणार का, लवकरच स्पष्ट होणार आहे.










