कॉम्रेडला गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम

untitled-1_1424523625
कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांना पंचगंगेच्या घाटावर कुठलेही धार्मिक विधी न करता अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांना त्यांची सून आणि नातवाने अग्नी दिला. दसरा चौकातून निघालेली अंत्ययात्रा सायंकाळी सहा वाजता पंचगंगेच्या काठावर आली. कम्युनिस्टांनी अंत्ययात्रेला ‘संघर्षयात्रा’ म्हटले होते. पंचगंगेच्या काठी कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचारांची शपथ ग्रहण केली आहे. येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, बी.जी.कोळसे पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी शोकसभेत भाषण केले. तसेच शाहीर संभाजी भगत आणि शितल साठे यांनी क्रांतिगीत गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सुरुवातीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दसरा चौकात ठेवण्यात आले होते. येथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येथे भावूक वातावरण होते. त्याचबरोबर शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहेच्या घोषणा दिल्या गेल्या. कार्यकर्ते आणि पानसरे यांच्या विचारांवार श्रद्धा असलेले लोक मोठ्या संख्येने हजर होते. यात कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, कॉम्युनिस्ट कार्यकर्ते, घरकामगार महिलांची संख्या मोठी होती. बहुतेक कार्यकर्ते आणि महिला या लाल रंगाचे झेंडे घेऊन उभे होते. दुपारी दिड ते साधारण तीन वाजता पर्यंत अंत्यदर्शन घेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा पंचगंगेच्या दिशने निघाली. दरम्यान, माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी पानसरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही? असा सवाल केला.
पानसरे यांचे शुक्रवारी रात्री 10.45 वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी मुंबईत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर 10.30 वाजता एअर अॅम्ब्युलन्सद्वारे कोल्हापूरला आणले गेले. यावेळी मुंबई विमानतळावर शासनाचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर तासभर रखडल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) शनिवारी कोल्हापूर बंद पुकारला होता तर, रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यात सर्व डाव्या पक्षांसह भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस देखील बंद मध्ये सहभागी असणार आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्या अंत्यविधीसाठी शासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. पानसरेंवरील हल्ल्यानंतर पाच दिवसांनी त्यांचे निधन झाले. अद्याप पर्यंत त्यांच्या मारेकर्‍यांचा सुगावा लागलेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रिमंडळातील कोणीही पानसरेंच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार नाही, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली होती.
कोल्हापूरमध्ये शनिवारी भाकपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाचे कॉम्रेड पानसरे अध्यक्ष असणार होते. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी हल्ला झाल्यानंतरही अधिवेशन रद्द करण्यात आले नाही. आज त्याच अधिवेशनाचे त्यांच्या शोकसभेत रुपांतर झाले. अधिवेशनासाठी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, पुणे येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. दुर्दैवाना त्या सर्वांना पानसरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
भाकपच्या अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले आहेत. कॉम्रे़ड पानसरेंच्या निधनाची बातमी कळाल्यापासून कार्यकर्त्यांना भावना अनावर होत आहेत. कार्यकर्त्यांनी आजच महाराष्ट्र बंदची हाक देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाकप नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी रविवारी महाराष्ट्रात बंद पाळण्यात येईल असे सांगितले आहे.
महाराष्ट्राचा तालिबान होत चालला – भालचंद्र नेमाडे
महाराष्ट्राचा तालिबान होत चाललाय त्याला वेळीच रोखायला पाहिजे. आता महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्याची लाज वाटत असल्याची खंत ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली आहे.
दाभोलकरांची हत्या होऊन दीड वर्ष झाले तरी त्यांचे मारेकरी का पकडले जात नाही? असा सवाल करुन नेमाडे यांनी राज्यातील सरकार आणि पोलिसात अपात्र माणसे असल्याचे म्हटले आहे. कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणावे असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले आता या राज्याला पुरोगामी म्हणण्याची लाज वाटत आहे.
आभाळ फाटले
आमच्या डोक्यावरचे आभाळ फाटले आहे. बोटभर चिंधीने आम्ही ते सांधू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी.पाटील यांनी व्यक्त केली. दाभोलकरांच्या हत्येला दीड वर्ष झाले तरी मारेकरी मोकाट आहे. तेव्हा आम्ही म्हणालो होतो, सामाजिक समतेच्या लढ्यातील हे शेवटचे बलिदान आहे. दुर्दैवाने दीडवर्षात कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखा योद्धा आम्ही गमावला. आता कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याने राज्यात हे घडत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया एन.डी. पाटील यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × = 24