
मुंबई- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर शुक्रवारी थांबली. ते ८२ वर्षांचे होते.
सोमवारी १६ फेब्रुवारीला कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांना कोल्हापूरहून हवाई रुग्णवाहिकेद्वारे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास त्यांना फुफ्फुसात रक्तस्राव झाला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, रिपाई नेते रामदास आठवले यांनी रुग्णालयास भेट देऊन पानसरे यांचे अंतिम दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता हवाई रुग्णवाहिकेद्वारे पानसरे यांचे पार्थिव कोल्हापूरात नेण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत कोल्हापुरातील दसरा चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगेच्या काठावर अंत्यविधी होणार आहेत.
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार या गावात पानसरे यांचा जन्म झाला. तरुण वयात राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेले पानसरे नंतर कम्युनिस्ट चळवळीकडे वळले. शोषित, वंचित, उपेक्षित कामगार, कष्टकरी वर्गासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचे सध्याचे वास्तव्य कोल्हापुरात असले तरी संबंध महाराष्ट्रात पुरोगामी राजकीय चळवळीत ते आघाडीवर होते. कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात ते असेच आघाडीवर राहिले होते. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.
दरम्यान, पाच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
लाल सलाम…!
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक झुंजार आणि लढवय्या नेता आपल्यातून हिरावून नेला, याचे मला अतिशय दु:ख वाटते.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. – खासदार सुप्रिया सुळे
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने डाव्या चळवळीबरोबरच शोषित, दलित समाजाचे नुकसान झाले आहे – रिपाइं नेते रामदास आठवले









