खासगी बँकांचे दंडही महागणार

abank
१ एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी
मुंबई वृत्तसंस्था – आगामी आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील बँकांनी विविध दंड आणि शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्र या बँकांनी बचत खात्यातील किमान ठेवींचे बंधन ग्राहकांनी न पाळल्यास दंडाची रक्कम वाढविण्याचे ठरविले आहे. बचत खात्यांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
बचत खात्यांमध्ये किमान रकमेची मर्यादा पाळली न गेल्यास बँकांनी ग्राहकांकडून दंड आकारावा, या आशयाची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी केली होती. त्यासाठी एक एप्रिल २०१५ ही तारीखही निश्चित करण्यात आली होती. खात्यातील किमान रकमेविषयी बँकांनी ग्राहकांना एसएमएस ​किंवा ई-मेलद्वारे माहिती देण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. ग्राहकांना योग्य त्या सूचना देऊनही त्यांना किमान रक्कम खात्यामध्ये राखण्यास अपयश आल्यास किंवा किमान मर्यादेपेक्षा खात्यातील रक्कम कमी राहिल्यास नंतर खात्यात जमा होणाऱ्या रकमेतून वळती करून घेण्याचेही आदेश बँकांना देण्यात आले आहेत.
‘ग्राहकांच्या बचत खात्यातील किमान रकमेचे दर तिमाहीनंतर होणारी तपासणी आणि त्यातून वसूल करण्यात येणारा दंड काही नवीन नाही. मात्र, या दंडाच्या शुल्कामध्ये घट करण्यात आली, तर त्याचा परिणाम बँकांच्या आर्थिक शिस्तीवर पडणार आहे. सध्या विविध बँकांकडून १०० ते ४,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. संबंधित ग्राहकाच्या प्रकारानुसारच आता ही वाढीव रक्कम आकारण्यात येणार आहे,’ अशी माहिती एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘एचडीएफसी बँके’तर्फे किमान रकमेची मर्यादा न पाळली गेल्यास स्लॅबप्रमाणे दंड आकारणार आहे. नव्या नियमावलीनुसार बँकेतर्फे १५० ते ६०० रुपयांदरम्यान दंड आकारण्यात येणार आहे. ग्राहकांच्या प्रकारानुसार या दंडामध्ये बदल करण्याचे अधिकारही बँकांनी राखून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर काही बँकांनी लॉकरच्या रकमेतही दुप्पट वाढ केली आहे. चुकीचा पत्ता अथवा संबंधित व्यक्ती जागेवर नसणे आदी कारणांस्तव चेकबुक आणि अन्य कागदपत्रे पुन्हा बँकेच्या पत्त्यावर आल्यास ‘एचडीएफसी बँके’तर्फे दंड आकारण्यात येणार आहे. या शिवाय ऑनलाइन बँकिंगसाठी नव्याने देण्यात येणाऱ्या ‘पिन’साठीही पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत. खात्यांमधील किमान रकमेची मर्यादा न पाळल्यास खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठ्या ‘आयसीआयसीआय बँके’तर्फेही शहरी भाग आणि महानगरांसाठी शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे. ग्रामीण भागाला अद्याप दंड आकारण्यात येणार नाही. कोटक महिंद्र बँकेने १ जानेवारीपासूनच दंडाचे नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे. अॅक्सिस बँकेनेही यापूर्वीच दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक शंभर रुपयांना पाच रुपये दंड किंवा सरसकट ३५० रुपये यापैकी जो कमी तो दंड आकारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 2 = two