‘खैरलांजीच्या माथ्यावर’ चित्रपटाला बोर्डने दिलेले प्रमाणपत्र रद्द

नागपूर – खैरलांजी हत्याकांडावर बेतलेल्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने दिलेले प्रमाणपत्र शुक्रवारी रद्दबादल ठरवीत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या चित्रपटावरील बंदी कायम ठेवली आहे. आक्षेपार्ह दृश्य वगळून नव्याने सेन्सॉरचे प्रमाणपत्र घ्यावे असे आदेश दिले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगनादेश देण्याची विनंती करणारी याचिका भय्यालाल भोतमांगे आणि अखिल भारतीय धम्मसेनेचे संयोजक रवी शेंडे यांनी दाखल केली होती.
भोतमांगे यांनी केलेल्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड. ए. हक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेले प्रमाणपत्र कायम ठेवणे अशक्य आहे, चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात यावी, चित्रपटाला नव्याने प्रमाणपत्र बहाल करीत असताना भय्यालाल भोतमांगे यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, यावर त्यांच्याकडून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्यानंतरच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करावे, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. भोतमांगे यांना या चित्रपटात ‘दारूडा’ तसेच भेकड चित्रित करण्यात आले आहे. हे व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा करीत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. कोणतीही विचारणा न करता निर्मात्यांनी मुंबईत चित्रपट दाखवला. चित्रपटातून चारित्र्यहनन होत असून, मुलीचीही प्रतिमा मल‌िन होत आहे. काही दृश्ये अवास्तव दाखवण्यात आली आहेत. मुलीवर झालेल्या अन्यायासाठी जणू आम्हीच कारणीभूत असल्याचा भास चित्रपटातून होत आहे. संपूर्ण चित्रपटावर आक्षेप नाही, मात्र काही दृश्ये वगळावी. कारण खैरलांजी हत्याकांड काल्पनिक नसून ते सत्य असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील जयदेव शामकुवर, अॅड. मिलिंद खोब्रागडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + = twelve