
मुंबई- ‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम! समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा’ असा स्वातंत्र्य, समता न्याय आणि बंधुतेचा संदेश देणा-या भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक शाळांत संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी ‘भारतीय संविधान दिना’चे औचित्य साधून प्रत्येक शाळांत संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेऊन ‘संविधान दिनी’ साजरा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत.
भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. ही तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना देशाचे जागरूक बनवणे आवश्यक आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रसार आणि प्रचार करण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी शिक्षण विभागाने संविधान दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.
‘संविधान दिना’च्या निमित्त प्रत्येक शाळेत प्रास्ताविकचे वाचन झाल्यानंतर संविधान यात्रा काढण्यात यावी, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समूहगान स्पर्धाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळांत संविधानातील अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. शाळा व गावांत संविधान सभा भरवून विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनासंविधानाबाबत माहिती होईल, असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आदेश डावलणा-यांवर कारवाई
संविधान दिनाच्या दिवशी सर्व शाळांत परिपाठ अथवा प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन दररोज करण्यासाठी मागील आघाडी सरकारने परिपत्रक काढून आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित शाळांकडून सर्रास हे आदेश डावलले जात असून अशा शाळांवर यापुढे कारवाई करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्याची माहिती विभागातील अधिका-यांकडून देण्यात आली.









