
श्रीनगर – कुपवाडा जिल्ह्यातील पंचगाम येथे भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून दोघा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात जवानांना यश आले आहे. या भागात अजूनही दोन्ही बाजूने अधून-मधून गोळीबार सुरू आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळच ही चकमक झडली. गेल्या १२ तासांपासून गोळीबार सुरू आहे. त्यात एक निरीक्षक तसेच एक जवान शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ही चकमक सुरू झाली. पंचगाम गावात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या भागाला घेरले होते. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि जोरदार चकमक झडली. गोळीबारात पाच पोलीस जखमी झाले असून दोन पोलीस बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघा पोलिसांचे अतिरेक्यांकडून अपहरण करण्यात आले असावे, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.









