चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या! – माणिकराव ठाकरे

download
मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यातील पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यापुढील काळात अशा चळवळीतील नेत्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कॉ. पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेला आहे. या घटनेमुळे राज्यात प्रतिगामी आणि सनातनी विचारधारा डोके वर काढत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील; तसेच पीडित, शोषितांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वच नेत्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना संरक्षण देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
विचारांशी लढाई विचारानेच झाली पाहिेजे, अशी भूमिका घेऊन स्वस्थ बसणे योग्य नाही. धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या नावाने गुंडगिरी सुरू आहे. देशात वैचारिक दहशतवाद थैमान घालत आहे. या सर्व प्रवृत्तींना रोखले नाही, तर आगामी काळात देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा; तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर, सनातन व प्रतिगामी विचारधारेचे समर्थन करणाऱ्या संघटनांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× seven = 35