
गुवाहाटी -‘गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट करून पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. पोलिस दल अत्याधुनिक आणि पोलिसांनी ‘स्मार्ट’ असायला हवं. पण चित्रपटांनी पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत मोदींनी सुरक्षेवर भर दिला.
‘आता बदलण्याची वेळ आली असून पोलिस दलाने ‘स्मार्ट’ झालं पाहिजे. SMART चा अर्थ आहे S म्हणजे Strict आणि Sensitive, M म्हणजे Mobile, A म्हणजे Alert, Accountable, R म्हणजे Reliable, Responsible, T म्हणजे Tech savvy किंवा Trendy.’ ‘देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट आणि सक्षम झाल्या पाहिजेत. ज्या देशाकडे बळकट गुप्तचर यंत्रणा आहे. त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही’, असं मोदींनी सांगितलं.
‘जनतेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून अनेक पोलिस शहीद झालेत, हे लोकांना कळलं पाहिजे. आतापर्यंत ३३ हजार पोलिस ड्युटीवर कर्तव्य पालन करताना शहीद झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. शिवाय चित्रपटांमधूनही पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे’, असं मोदी म्हणाले. ‘जनतेपर्यंत शहीदांची गाथा पोहचवण्याचं काम करण्यासाठी शहीद पोलिसांच्या सन्मानासाठी स्पेशल टास्क फोर्स असायला हवा. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असं एक पुस्तक प्रत्येक राज्याने शहीद जवानांसाठी बनवलं पाहिजे. एवढचं काय तर प्रत्येक पोलिस ठाण्याची वेगळी वेबसाईट झाली तरी काही हरकत नाही’, असं मोदींनी सांगितलं.









