
बिलासपूर – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडला जाऊन नसबंदी शस्त्रक्रिय़ेनंतर मरण पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
राहुल गांधी यांनी या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकार आपल्यावरील जबाबदारी टाळत असून, रमण सिंह सरकार लपवाछपवी करत आहे. ही निव्वळ दुर्लक्षाने घडलेली घटना नाही. यात भ्रष्टाचार असून बनावट औषधांचा वापर झाल्याचा आरोप राहुल यांनी केला.
बिलासपूरमधील ज्या शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या तेथे चांगली व्यवस्था नव्हती येथे आलेल्या अनेकांना इजा झाली होती. राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी टाळत असून, लपवा छपवी सुरु असल्याचे राहुल म्हणाले.
राहुल यांनी रुग्णालयालाही भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या महिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिलासपूरमधील नसबंदी शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेणा-या १३ महिलांचा मृत्यू झाला असून, १३८ महिला आजारी आहेत. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडणारे डॉ. आर.के. गुप्ता यांना अटक केली आहे. डॉ. गुप्तांना मदत करणारे डॉक्टर आणि सहका-यांचा पोलिस शोध घेत आहेत.









