
लखनऊ -उत्तर प्रदेशमधील बचारवन रेल्वे स्थानकाजवळ डेहराडून-वाराणसी जनता एक्सप्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये ३० जण ठार तर १५० जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ पासून ५० किमी अंतरावर असेल्या बचारवन रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे लखनऊचे विभागीय आयुक्त महेश गुप्ता यांनी सांगितले. घटनास्थळी रेल्वे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे लखनऊ-वाराणसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडूनदोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल आणि अजय शुक्ला यांना घटनास्थळी भेट देण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.









