जमिन अधिग्रहण विधेयकावरून संसदेत विरोधकांनी केला सभात्याग

download
नवी दिल्ली- लोकसभेत आज विरोधी पक्षांच्या मोठ्या विरोधानंतरही जमिन अधिग्रहण विधेयक सादर करण्यात आले. सरकार एकतर्फी निर्णय लादत असल्याचे सांगत विरोधकांनी लोकसभेतून सभात्याग केला. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचे म्हटले आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही वॉक आऊट केला आहे.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे की, जमिन अधिग्रहण विधेयकावर आता चर्चा करण्याची नव्हे कृती करण्याची गरज आहे. दुसरीकडे संसदीय कार्यमंत्री व्यंकया नायडू यांनी म्हटले आहे की, लोकसभेत या विधेयकावरून चर्चा करावी. त्यातून योग्य तो सार काढावा आम्ही विधेयकात बदल करण्यास तयार आहे.
त्याआधी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेतही जमिन अधिग्रहण अध्यादेश आणण्याचे जोरदार समर्थन केले. सरकारने आपल्या अधिकारांतर्गत हा अध्यादेश आणला आहे. संसदेला बायपास करून अध्यादेश मंजूर केल्याचे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत. यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात असे अनेक अध्यादेश मंजूर केले होते. आनंद शर्मा यांनी मात्र जेटलींवर हल्ला चढवत, काय आपल्याला वाटत आहे की संसद रबर स्टॅम्पसारखे आपल्या अध्यादेशाला मान्य करेल?
बॅकफूटवर जाण्याची गरज नाही, विधेयक योग्यच: मोदी
दरम्यान, आज सकाळी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहभाग घेतला. या बैठकीत जमिन अधिग्रहण विधेयक लोकसभेत सादर करण्याची रणनिती ठरवली गेली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी हे विधेयक अतिशय योग्य असल्याचे सांगत या मुद्यांवरून बॅकफूटवर जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले. हे विधेयक शेतकरीविरोधी नसून शेतक-यांच्या हिताचे असल्याचेही मोदींनी ठासून सांगितले.
अण्णांच्या आंदोलनाठिकाणी आज गर्दी वाढली- केंद्र सरकारने संसदेला बायपास करून जमिन अधिग्रहण विधेयक मंजूर केल्याने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सोमवारीच्या तुलनेत आज लोकांची गर्दी वाढली आहे. अण्णांचे एकेकाळचे सहकारी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सोमवारी सायंकाळी केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी महाराष्ट्र सदनात अण्णांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. अण्णांनीही या दोघांना आशिर्वाद देत आपचा पाठिंबा स्वीकारला आहे. सत्ताधारी भाजप वगळता काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांनीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातील बहुतेक पक्षाचे नेते अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven − = 1