
यवतमाळ – जिल्ह्यातील 372 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपुर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधीत यंत्रणेसोबतच विविध विभागांनीही या गावांमध्ये विकासाची कामे राबवून आपला सहभाग देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागांनी विकासाचा आराखडा तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
पालकमंत्र्यांनी दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, जलयुक्त शिवार योजना व तालुक्यातील तलाठी कार्यालयाचा बांधकामाचा आढावा दारव्हा येथील बचत भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य पंढरी सिंहे, संगिता इंगोले, पंचायत समिती सभापती उज्वला बनसोड, उपसभापती प्रा.सुषमा गावंडे, सदस्य चरण पवार, जयश्री मिराशे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारण, पाणलोटची कामे करून या गावांमधील पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली काढायची आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणा काम करीत आहे. परंतु येवढयावरच न थांबता ही गावे विकासाच्या दृष्टीने परिपुर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणन रस्ते, पक्के रस्ते, इमारत बांधकाम, रुक्ष लागवड, विजेच्या समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यासह विविध प्रकारची कामेही करावयाची आहे. त्यामुळे निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाने आठ दिवसात विकास आराखडा सादर करावा व कामे करावी, असे पालकमंत्र्यानी सांगितले. या कामांसाठी विभागाअंतर्गत असलेला विधीचा उपयोग करावा. निधी उपलब्ध नसल्यास मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले. गावांमध्ये विकासाची कामे करत असतांना गावकऱ्यांना विश्वासात घ्या. जलशिवार योजनेअंतर्गत कामांचे मुल्यमापण होणार असल्याने काळजीपुर्वक कामे केले जावे, असेही त्यांनी सुचविले. जिल्ह्यातील या योजनेतील गावे राज्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा पध्दतीने गावांमध्ये कामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. या योजनेअंतर्गत दारव्हा तालुक्यातील 46 गावांमध्ये कामे केली जात असून यावेळी या सर्व गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. या सर्व गावातील विकास आराखडे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत सरपंचासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित 46 गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले.









